पुणे स्थानकावर लक्ष ठेवण्यासाठी “फेस रिकग्नायझेशन’ यंत्रणेचा प्रस्ताव
प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे
आगामी अंदाजपत्रकात प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता
पुणे – रेल्वेत अथवा रेल्वे स्थानकात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित “फेस रिकग्नायझेशन’ यंत्रणा पुणे रेल्वे स्थानक परिसरात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला असून, आगामी अंदाजपत्रकात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
रेल्वे स्थानक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यावर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. देशातील काही निवडक शहरांमध्ये अत्याधुनिक फेस रिकग्नायझेशन’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून, महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानकाची निवड केली आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून, नुकतेच यासंदर्भातील प्रस्ताव पुणे रेल्वे प्रशासनाकडून केंद्रीय मंत्रालयाला पाठविला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पुण्यासह बेंगळुरु सारख्या “मेट्रो सिटी’तील रेल्वे स्थानक परिसरातदेखील ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडे बेंगळुरुसह पुणे रेल्वे स्थानकाचादेखील प्रस्ताव आहे. मध्य रेल्वेमध्ये या यंत्रणेचा वापर होणारे पुणे हे पहिलेच स्थानक असणार आहे, असे सूत्रांनी नमूद केले. याबाबत पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अशी असेल यंत्रणा
“सीसीटीव्ही’च्या बरोबरीने “फेस रिकग्नायझेशन सिस्टीम’चे काम चालणार आहे. स्थानकामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून “कॅप्चर’ होणार आहे. रेल्वे यंत्रणेकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या माहितीनुसार, गुन्हेगार किंवा संशयित स्थानक परिसरामध्ये आल्यास त्याची सूचना आरपीएफला ताबडतोब मिळणार आहे.
गुन्हेगारीला बसेल आळा
अनेकदा रेल्वे स्थानक परिसरात मोबाइल चोरी, पाकीटमारीच्या घटना घडतात. यासह प्रवासामध्ये गुंगीचे औषध देऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली जाते. रेल्वे स्थानकांना दहशतवादी हल्ल्याचा धोकादेखील असतो. स्थानक परिसरात येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता गुन्हेगारांना स्थानकातून पळ काढणे सोपे असते. परंतु, या यंत्रणेची अंमलबजावणी केल्यास हा धोकादेखील कमी होणार आहे. बोगस दलालांच्या संख्येला आळा घालण्यासह स्थानक परिसरामध्ये होणाऱ्या गुन्ह्यांनादेखील आळा बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.