शिंदे वासुली (वार्ताहर) -भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (दि. 8) सलग दुसऱ्या दिवशी कुटुंबासह पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन कायम ठेवले व आमची “आर या पार’ची लढाई सुरू झाल्याचा इशारा सरकारला दिला आहे. यावेळी लोकप्रतिनिधींसह शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. सलग दुसऱ्या दिवशी प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधीचा पवित्रा कायम ठेवल्याने प्रशासनाची तंतरली होती.
भामाआसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आसखेड हद्दीतील जलवाहिनीच्या कामाला ठाम विरोध असून जोपर्यंत जलवाहिनीचे काम बंद होत नाही तोपर्यंत प्रत्येक प्रकल्पग्रसत शेतकरी आपापल्या गावातील धरणाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे निवेदन शनिवारी (दि. 6) दिले होते. तर रविवारी (दि. 7) पाईट भागातील गवारवाडी, कुदळवाडी, देवतोरणे आदि गावातील शेतकऱ्यांनी बायका मुलांसह पाण्यात उतरुन आंदोलनाला सुरुवात केली.
काही आंदोलनप्रमुखांनी शेतकऱ्यांना समजूत घालून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. परंतु शासनाने जलवाहिनीचे काम चालूच ठेवल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळपासून पुन्हा पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आंदोलकांना समजावून सांगण्यासाठी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, पिंपरी चिंचवड उपायुक्ता स्मिता पाटील, सहआयुक्त रामनाथ जाधव, महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी सोनटक्के आंदोलनाच्या ठिकाणी हजर झाले.
आज दुसऱ्या दिवशी आखतुली, ठरवली, वेल्हावळे, साबळेवाडी, टेकवडी, वाघू, कासारी, अनावळे, गवारवाडी, कुदळवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिला, लहान मुले व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धरणाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनाकडून अधिकारी व देवीदास बांदल, सत्यवान नवले आदी आंदोलनप्रमुखांनी पाण्यातून बाहेर येऊन पाण्याबाहेर आंदोलन करण्याची विनंती केली. तरीही शेतकरी पुरष व महिलांनी जो पर्यंत जलवाहिनीचे काम बंद होत नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नसल्याचे सांगितले.
शेवटी मंगळवारच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरवता येईल, अशी खात्रीपूर्वक समजूत घातली तेव्हा आंदोलक पाण्यातून बाहेर आले; परंतु पाण्याबाहेरही शेतकऱ्यांनी मागण्यांचा पुनरुच्चार करीतआंदोलन सुरूच ठेवले.