शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन, पालकमंत्र्यांनाही केली विनंती
सातारा (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्ती लागू केली आहे. हेल्मेट घातले म्हणून करोनापासून बचाव होईल किंवा करोना होणार नाही असे नाही. करोनापासून बचावासाठी मास्कची सक्ती आवश्यक आहे. पण, हेल्मेट सक्ती चुकीची आहे. स्वेच्छेने हेल्मेट वापरायचे असेल त्यांना वापरु द्या. राज्यात कोणत्याही शहरामध्ये हेल्मेटची सक्ती होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लोकांच्या अडचणी आणि जनभावनांचा विचार करुन कुठेही हेल्मेट सक्ती करु नये, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
दरम्यान, जनभावना लक्षात घेऊन हेल्मेट सक्ती करु नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनीही जिल्हा प्रशासनाला द्याव्यात, अशी विनंती शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. बाळासाहेब पाटील यांना केली आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा नवा निकष घातला आहे. पुण्यासारख्या शहरातही हेल्मेट सक्ती होऊ शकली नाही. हेल्मेट सक्तीच्या विरोधात वारंवार जनआंदोलने झाली आहेत आणि प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे यांसह कोणत्याही शहरात हेल्मेट सक्ती नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाने अचानक हेल्मेट सक्तीचा निर्णय का घेतला हे अनाकलनीय कोडे आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर दुचाकीवर दोन लोकांना प्रशासनाने परवानगी देताना दुचाकी चालकास हेल्मेट सक्ती लागू केली.
करोनापासून बचाव होण्यासाठी मास्क अनिवार्य आणि मास्कची सक्ती योग्यच आहे. पण, हेल्मेट सक्ती कशासाठी, असा सवाल उपस्थित झाला आहे. हेल्मेट सक्तीचा कायदा आहे हे सर्वांना माहिती आहे. ज्यांना हेल्मेट वापरायचे आहे त्यांना ते वापरु द्या. पण सक्ती करु नका. जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्ती केल्याने वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली सुरु झाली आहे. मुळात हेल्मेट सक्ती करणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्ती करु नये आणि त्यासाठी पोलीस प्रशासनानेही दंड वसुलीसारखे प्रकार करु नयेत, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.