केतकावळे -दीड महिन्यापासून पुरंदर तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बहुतेक सर्वच पिके नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची वारंवार मागणी केली होती; परंतु पिकांचे नुकसान झालेच नाही, अशी माहिती देणाऱ्या प्रशासनाला अखेर उपरती आली आहे.
तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी कृषी विभागाला नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उशिरा का होईना पण प्रशासनाला शहाणपण सुचले, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खरीप हंगामात जुलै, ऑगस्ट या महिन्यात तालुक्यात जवळपास 20 ते 25 दिवस सलग पाऊस सुरू होता. वाटाणा, घेवडा, भुईमूग, मूग, बाजरी, भात ही पिके डाळिंब, पेरू, सीताफळ, फळपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तातडीने पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती; परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करून नुकसान झालेच नाही, असा खोटाच अहवाल कृषी विभागाने तहसील कार्यालयामार्फत जिल्हा कार्यालयाकडे कळविला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला असून उर्वरित पिके झोपली आहेत.
कांदा रोपांचे सर्वाधिक नुकसान
यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा रोपे तयार करण्यासाठी बियाणे शेतात टाकले होते. सध्या कांदा बियाणांच्या एका पायलीचा दर 8 ते 10 हजार रुपये इतका असून एवढ्या महागड्या दराने खरेदी करून बियाणे शेतात टाकले; परंतु अती पावसाने ते जळून नष्ट झाले आहेत. परिणामी यंदा लागवडीवर परिणाम जणवणार आहे. 90 टक्के कांदा रोपे जळून नष्ट झाल्याने आता पंचनामे कशाचे करणार? पंचनाम्यात काय दाखविणार आदी प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.