गोवाहटी – मध्य आसाममधील नागावन जिल्ह्यात 5 कुटुंबांच्या घरांवर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. या कुटुंबांनी बनावट कागदपत्रे दाखवून अतिक्रमण केले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र या कारवाईमागे वेगळेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी पोलीस कोठडीमध्ये एका मच्छिमाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संबंधित पोलिस स्थानकावर जमावाकडून बटाद्रवा पोलीस स्थानक पेटवून देण्यात आले होते. काही पोलीस कर्मचाऱ्यांना जमावाकडून मारहाण देखील करण्यात आली होती. त्या घटनेमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांवरच ही कारवाई करण्यात आली आहे.
जातीय हिंसाचारातील गुन्हेगारांची घरे बुलडोझरच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्याची कारवाई यापूर्वी दिल्ली, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये करण्यात आली होती. आता आसाममध्येही तशाच प्रकारची कारवाई झाली आहे.
शनिवारी झालेल्या जाळपोळीच्या आणि हिंसाचाराच्या घटनेमागे अल कायदाशी संबंधित बांगलादेशातील संघटना अन्सार उल इस्लामचा हात होता का, हे तपासण्यासाठी आसाम सरकारने एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या घटनेमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. जोपर्यंत भाजपचे सरकार सत्तेत आहे, तोपर्यंत अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल सांगितले.
बटाद्रवा येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण हटवण्यात यावे. स्थानिक शांततेला धोका असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेशही जिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिल्या असल्याचेही सर्मा यांनी सांगितले.