मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत घेतलेल्या त्या शपथविधीमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यानंतरच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येऊ शकले. सध्याची राजकीय परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. एकेकाळी मित्र असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना आता भाजपपासून दूर आहे. अशात राज्यात नेमके कोणत राजकीय समीकरण असणार हे सांगणे कठीण आहे.
अशात राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अजित पवार यांची राजकीय विधाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणं आणि त्यांचं अचानक नॉट रिचेबल होणं या सर्व विधानातून अजित पवार हे भाजपला डोळा मारत असल्याचं सांगितलं जात आहे.
अशात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही अजित पवार यांना डोळा मारला आहे. अजित पवार भाजप आणि शिवसेना युतीसोबत येणार असल्याचं अप्रत्यक्ष विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, ‘आमच्या सोबत बरेच आमदार आहे. कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज आहे. आणि तिथी लवकरच येणार आहे. असं म्हणत ते पुढे म्हणाले, अजून तरी कूळ बघावे लागेल, गुण जुळावे लागतील त्यानंतर ते काम करावे लागेल, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. आमच्या सोबत येणारे आमदार राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर गुलाबराव पाटील यांनी हसत उत्तर दिलं. अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे सध्या. आकडा ते म्हणतील तोच आकडा होईल, असंही त्यांनी म्हणून खळबळ उडवून दिली आहे.’ असं म्हणत त्यांनी संकेत दिले आहे.