-मनपा दाखविणार का सर्वत्रच अशी तत्परता? काळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केला प्रश्न
-जन आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
-नगरमध्ये ठाकरेंनी युवकांशी साधला मुक्त संवाद
-मंत्र्यांपुरताच सफाईचा देखावा का?
नगर – जन आशीर्वाद यात्रेनिमित्त युवासेनेचे आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थींनींनी महाविद्यालय परिसरात हॉटेल व्यावसायिकांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर या द्वयींनी तडक महाविद्यालय गाठले. तसेच परिसराची पाहणी करून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. व तत्काळ कचरा उचलण्याच्या सूचना केल्या.
त्यामुळे आगामी काळातही येथे कचरा टाकल्यावर या द्वयींकडे व्यथा मांडावी लागेल का?, या गंभीर समसेवर मनपाप्रशासन आगामी काळात कचरा टाकणाऱ्यावर काही कार्यवाही करेल का? असा प्रश्न विद्यार्थिनींमधून उपस्थित होत आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी माऊली सभागृहात सोमवारी (दि.22) रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रद्घा तापकीरे हिने महाविद्यालय परिसरात हॉटेल व्यवसायिकांकडून वारंवार कचरा फेकला जातो. त्यामुळे हजारो विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाविद्यालयांच्या वतीने मनपा प्रशासनाला वारंवार कळवून व पत्र देवूनही मनपा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर तातडीने आदित्य ठाकरे यांनी राधाबाई काळे महाविद्यालय येथे जाऊन परिसराची पाहणी केली.
तसेच महानगरपालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना याबाबत सूचना करून तातडीने या कचराकुंडी बाबत आणि स्वच्छतेबाबत त्वरीत कारवाई करावी. त्यानंतर मनापा प्रशासनाने त्वरीत जेसीबीच्या साह्याने नाले सफाई करून तेथील कचरा उचलला. अशीच तत्परता महानगरपालिका इतरत्र दाखविणार का असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. महाविद्यालयाच्या जवळ अनेक हॉटेल व्यावसायिक कचरा टाकत आहेत. याबाबत महाविद्यालयाने वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याची कुठलीच दखल मनपा प्रशासनाने घेतली नाही.
तसेच एका युवकांने मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक माझ्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलत आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते बोलतात. मी राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी फिरत आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे हा माझा प्राधान्यक्रम आहे. बाकीच्या कुठल्या पदाबाबत मला स्वारस्य नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत दादा पाटील नेमके काय म्हणाले, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणे उचित नाही.
अजूनही दमबाजीचे राजकारण !
केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाबाबत कल्याणी सातपुते यांनी प्रश्न उपस्थित करून, यातील आरोपी आ. संग्राम जगताप आणि आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव घेत, राजकारण्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला. त्यावर हे अत्यंत चूक असल्याचे सांगत, राजकारण बदलत चालले असतानाही काही लोकांचा अजूनही हिंसा, दमबाजी केली तरच राजकारण होते, असा समज असल्याने आता नागरिक आणि युवकांनीच जागृत होण्याची गरज असल्याचे सांगितले.