- अडीच वर्षात केवळ 360 प्रमाणपत्रेच दाखल
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार शाळांमध्ये शिक्षक पदांवर नोकरीला लागले आहेत.
अडीच वर्षात यातील केवळ 360 शिक्षकांचीच “टीईटी’ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल झाली आहेत. यातील सात बोगस आढळली. उर्वरित पडताळणीसाठी दाखल व्हावीत यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांवर वचक दाखवावा लागणार आहे.
2013 नंतर शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी “टीईटी’ उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. 31 मार्च 2019 पर्यंत “टीईटी’ उत्तीर्णचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश होते. अन्यथा सेवा समाप्त करून वेतन थांबविण्याच्या सूचना होत्या. सुमारे 8 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या. यावर काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
बऱ्याचशा शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र तयार करून दाखल केल्याच्याही तक्रारी होत्या. राज्य परीक्षा परिषदेने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.