त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी : टोळी रस्त्यावरच मांडते ठाण
सोमेश्वरनगर -बारामती शहरातील कुत्र्यांच्या दहशत आता हळूहळू ग्रामीण भागतही सरकरकताना दिसत आहे. सोमेश्वरनगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिस वाढ होत असल्यने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. तर या समस्येवर प्रशासनाने त्वरीत उपायोयोजना करून या कुत्र्यांचा बंदोस्त करावा, अशी मागणी जोर धरीत आहे.
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. सोमेश्वर नगर हे मोठे शैक्षणिक संकुलन असून शालेय विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघळवाडी, करंजेपूल, वाणेवाडी हा परिसरामध्ये शाळा-महाविद्यालयात व छोटे-मोठे व्यवसाहिक आणि हॉस्पिटल असल्याने रोज शालेय विद्यार्थ्यांनसह, नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. मात्र, अशातच भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून, यावर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या घटना विविध भागांमध्ये वारंवार घडत असून या परिसरातही मोकाट कुत्र्यांची संख्यादिवसेंदिवस वाढत असूनही प्रशासन सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परिसरात शेकडो भटके कुत्रे असावेत, असा अंदाज आहे. मात्र सर्व भागात निर्बिजीकरण होत नसल्याने ही संख्या नियंत्रित राहिलेली नाही. उलट भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.
भटके कुत्रे रस्त्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना अधिक त्रास होतो. रात्री उशिरा घरी परतणाऱ्यांनाही कुत्र्यांची भीती असतेच. शिवाय सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या पाठीही कुत्रे लागतात. त्यात एखादा कुत्रा पिसाळला किंवा जखमी झाला तर त्या परिसरात धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्यामध्ये भीती
संबंधित विभागाने त्वरित याकडे लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. सध्या सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यातच ही भटकी कुत्री टोळक्याने रस्त्यावरच ठाण मांडून बसतात किंवा भांडण करीत असतात त्यामुळे ऊसवाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टरसह इतर प्रवासी वाहनांना ती अडथळा ठरत आहेत. एखादेवेळी अपघातही घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.