ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव : बळीराजा पुन्हा संकटात
काऱ्हाटी – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सलग चार ते पाच वर्षे पावसाअभावी पेरणीच न झाल्याने अथवा दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे कबंरडे मोडले होते. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने चांगलेच तारले होते. दरम्यान, बारामती तालुक्यात खरीपपेक्षा रब्बी शाश्वत असल्याने खरीप हंगामात जादा शेतकरी पेरणी करीत नाही. मात्र, यंदा पावसाने साथ दिल्याने काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेतले होती.
तर वातवरणानेही साथ दिल्याने पीक चांगले होते. मात्र, त्याचवेळी अतिवृष्टीमुळे हे पीक वाहून गेले. तरी हार न मानता त्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. दमदार पाण्यामुळे यंदा दमदार उत्पन्न निघेल, अशी आशा होती; मात्र वातावरणाने दगा दिला अन् रब्बी हंगामावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे खरीप अतिवृष्टिने तर रब्बी हंगाम अळीने खाल्ल्याची प्रतिक्रीया बळीराजाने दिली.
यंदा दमदार पावसामुळे विहिरी, तलाव, ओढे, नाले अद्यापही तुडुंब भरले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी केली आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना बसत आहे. गव्हाच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. अगोदर असलेल्या ज्वारीवर पडलेली अळी आता गव्हावर पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
गव्हाबरोबर तूर, हरभरा पिकांवर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बोंड अळी, लष्करी अळी या सर्व रोगराईमुळे सर्व पिकांना फटका बसला आहे.पिकांवर लागवडीपासून शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यामध्ये मजुरांकडून होणारी बेजारी यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी ज्वारी पीक घेत होते; परंतु या वर्षी परतीच्या पावसाने खरिपाची सर्व पिके वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी रब्बीसाठी मात्र शेतकऱ्यांना आशा होती. त्यामुळे यावर्षी गाव शिवारात गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. हरभऱ्याचे पीक बहरात असताना अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शाश्वत रब्बी हंगामानेही केले निराश
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, सरकारने जाहीर केलेली मदत अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. तर दुसरीकडे पावसाचे पाणी शेतात साचल्याने रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यातच आता शाश्वत अशा रब्बी हंगामातील पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बीनेही बळीराजाला निराश केले आहे. एकंदरीतच सातत्याने येत असलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.