श्रीगोंदा -तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या काष्टी आणि बेलवंडी बुद्रुक ग्रामपंचायतींसह एकूण दहा ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर अखेर संपणार आहे. नवीन शासन निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचे सरपंच आता थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे.
तालुक्यातील पिंपळगाव पिसा आणि अरणगाव दुमाला या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर काष्टी, बेलवंडी बुद्रुक, बनपिंप्री, चवर सांगवी, घोगरगाव, तरडगव्हाण, थिटे सांगवी, तांदळी दुमाला, माठ आणि पारगांव सुद्रिक या दहा ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर अखेर संपणार आहे. यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या काष्टी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या बेलवंडी बुद्रुक, आ.अरुण जगताप यांच्या बनपिंप्री, “नागवडे’ कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या घोगरगाव या गावांचा समावेश आहे.
तालुक्यातील या प्रमुख नेत्यांच्या गावच्या निवडणुका डिसेंबर अखेर होऊ घातल्याने या पंचवार्षिक निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता असणार आहे.आ. जगताप यांचा अपवाद वगळता अन्य तीनही नेत्यांना ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मोठ्या तयारीनिशी उतरावे लागणार आहे. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हटून भाजप प्रणित शिंदे सरकार आल्याने सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचे आदेश राज्य सरकारने पुन्हा दिले आहेत. यापूर्वीही जेव्हा तालुक्यात मागीलवेळी जनतेतून सरपंच निवड झाली होती, त्यावेळी देखील याच दहा ग्रामपंचायतींमध्ये जनतेतून सरपंच निवड झाली होती.