पूरक घटकांना झळ; धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी हार,फुले विक्रेत्यांची आर्त हाक
– उदयकांत ब्राम्हणे
कोरेगाव भीमा – सर्व धार्मिक स्थळे करोनामुळे अध्यापही बंद आहेत. याचा फटका उदबत्ती, हार, नारळ, प्रतिमा तसेच फळ विक्रेते यांना बसला आहे. सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. अनलॉक मध्ये सर्व व्यवहार सुरू होत असताना श्रद्धा स्थानं कुलुप बंद का? असा प्रश्न उपस्थित होत असून सरकार केंव्हा पावणार? याची सदर विक्रेत्यांना आस लागली आहे.
करोनामुळे सर्वच व्यावसायांची वाताहत झालेली असताना यातून धार्मिक स्थळांबाहेर पुजा साहित्य विक्री करणोही सुटलेले नाहीत. धार्मिक विधी व पूजेसाठी फुलांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक मंदिर, चर्च, मस्जिदच्या बाहेर फुलांचे हार, नारळ, अगरबत्ती, पुजेचे साहित्य विकले जाते. यातूनच कुटुंबास मोठा हातभार लागत असतो. परंतु, करोनामुळे सर्वत्र मंदिर, चर्च, दर्गा, धर्मिकस्थळे तसेच लग्न, वाढदिवस इतर सोहळ्यांवरही बंदी आहे. याचा परिणाम फुल व्यवसायावर झाला आहे.
बाजारात फुले नाहीत. ग्राहक नाही, या सर्वांचा परिणाम फूल उत्पादक व विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शासनाने अनेक व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. परंतु अद्यापही देवदर्शनास परवानगी दिली नाही. त्यामुळे ऐन श्रावण, गणपती व आता नवरात्रात मंदिरे खुली होऊ शकली नाहीत. हंगाम गेला अन् शासनाने आदेश दिला, अशी अवस्था विक्रेत्यांची झाली आहे.
गावच्या भैरोबा देवाची व गावातील इतर सर्व मंदिरांची सेवा 45 वर्षांपासून सेवा करीत आहेत. सध्या करोनामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाहेर पडावं तर करोना अन् घरात बसावं तर खायचं काय, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने निर्णय घेऊन मंदिरे खुली करावीत.
– चंद्रकांत भैरवकर, गुरव.
करोनामुळे हार, फुल विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला आहे. लग्नसराई, श्रावण, गणेशोत्सव गेले आता नवरात्रोत्सव पण तसाच जाणार. व्यवसाय तरी कसा करायचा. सध्या, शेतीवर लक्ष देऊन आहोत तेच आता मुख्य जीवनाचे साधन बनलं आहे.
-श्रीधर शिंदे, फुल व्यवसायिक, लोणीकंद.