चंडीगढ – कॉंग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी रोजगाराच्या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले. केजरीवाल यांनी चर्चेसाठी पंजाबमधील कुठलेही ठिकाण सांगावे किंवा मला दिल्लीला बोलवावे, असेही त्यांनी म्हटले.
तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशात एका सभेत बोलताना सिद्धू यांनी आपचे प्रमुख केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. केजरीवाल हे केवळ राजकीय पर्यटक आहेत. ते खोटारडे आहेत. निवडणूक जवळ आल्याने ते खोटी आश्वासने घेऊन पंजाबमध्ये येत आहेत.
त्यांनी दिल्लीत 8 लाख रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केवळ 440 जणांना रोजगार दिला. केजरीवाल यांनी माझ्याशी जाहीर चर्चा करावी. त्यामध्ये माझी पीछेहाट झाल्यास मी राजकारण सोडेन, असे सिद्धू म्हणाले.
पंजाबमध्ये सत्तारूढ कॉंग्रेसपुढे आपने मोठे आव्हान उभे केले असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने केजरीवाल आणि त्यांचा पक्ष आहे.