मुंबई – मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashree Pradhan) अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी तेजश्री सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता आपल्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. घटस्फोटानंतर तिने पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत तेजश्रीने लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचे हे नातं फार काळ टिकू शकले नाही. घटस्फोटाच्या 9 वर्षानंतर आता आपल्याला पुन्हा लग्न करायचे असल्याचे तेजश्रीने सांगितले आहे. एका मुलाखतीत तेजश्री म्हणाली, “लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत. मला कुटुंब आवडते. मला कुटुंब हवं आहे. मला लग्न करायचे आहे.”
पुढे ती म्हणाली, “लग्न करायचे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या 24 -25 व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण, मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचं आहे. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे. कारण मला बोलायला आवडते. मी पार्टी करणारी मुलगी नाही, मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो.” तेजश्रीचे हे विधान सध्या चर्चेत आले आहे. तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.