दम्बुला – कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या मदतीने भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर दुसऱ्या टी-20 सामन्यात 5 गडी राखून मालिका विजय मिळविला. श्रीलंकेने दिलेले आव्हान भारताने 19.1 षटकांत 5 बाद 126 धावा करत पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. श्रीलंकन संघाच्या सलामीवीर विष्मी गुणरत्ने आणि चमारी अथपथु यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण ही जोडी बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर लोटांगण घातले.
श्रीलंकेच्या अन्य एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकली नाही. या दोघांनी अनुक्रमे 45 आणि 43 धावा केल्या. श्रीलंकेने 20 षटकांत 7 बाद 125 धावांचे आव्हान उभे केले. भारताकडून दिप्ती शर्माने दोन विकेट्स घेतल्या. तर राधा यादव, पूजा वस्त्रकार, रेणुका सिंग आणि हमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात भारतीय संघ सहज विजय मिळवेल असे वाटत होते. पण त्यांना देखील शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. सलामीवीर स्मृती मंधानाने 34 चेंडूत सर्वाधिक 39 धावांचे योगदान दिले. त्यानंतर शेफाली वर्मा आणि सबभीने मेघना यांनी प्रत्येकी 17-17 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरने 32 चेंडूत नाबाद 31 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, टी-20 मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. आता मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना 27 जून रोजी खेळला जाणार आहे.