चेन्नई :- वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ पाहिला तर मग देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी करण्याचा उपयोग काय? जर आयपीएल स्पर्धेत यशस्वी ठरलेल्यांनाच संघात घेतले जाणार असेल तर संघ निवडीचे निकष काय आहेत, असा संतप्त सवाल तमिळनाडूचा फलंदाज अभिनव मुकुंद याने बीसीसीआयला विचारला आहे.
आयपीएल स्पर्धेत यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान दिले गेले मात्र, माझ्यासारख्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सातत्याने धावा करत असलेल्या खेळाडूंना भविष्य काय आहे, असा सवालही त्याने केला आहे.
पूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करत असलेल्या खेळाडूंचाच प्रामुख्याने संघ निवडीसाठी विचार केला जात असे, आता आयपीएल स्पर्धेतील कामगिरीवरून संघ निवड होते ही शोकांतिका आहे, अशा शब्दात मुकुंदने आपली निराशा व्यक्त केली आहे.
मुकुंदने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत 145 सामने खेळताना तब्बल 10 हजार 258 धावा केल्या आहेत. तरीही ही कामगिरी संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी नाही का, असाही सवाल त्याने केला आहे.
गेल्या दोन मोसमात मी सातत्याने धावा केल्या आहेत. तरीही निवड समिती माझा विचार करत नाही याची खंत वाटते. असेच जर सुरु राहिले तर येत्या काळात कोणत्याही खेळाडूला देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याची इच्छा राहणार नाही व तो केवळ आयपीएल स्पर्धेतच खेळण्याची मानसिकता वाढवेल. मात्र, यातून भारतीय क्रिकेटचेच नुकसान होणार आहे, असा इशाराही मुकुंदने दिला आहे.