तेलंगणात सत्तेवर असलेला “भारत राष्ट्र समिती’ हा पक्ष आता पूर्ण जोमाने महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी धडपडतो आहे. त्यांच्या या एन्ट्रीविषयी मोठेच कुतूहल आहे. हा पक्ष आधी “तेलंगणा राष्ट्र समिती’ नावाने प्रचलित होता. या पक्षाने तेलंगणात दोन वेळा मोठ्या बहुमताने सत्ता मिळवली आहे. या पक्षाने त्या राज्यात अनेक घटकांसाठी मोठेच काम केले आहे, हे खरे आहे. त्यातही हा पक्ष तेथील शेतकऱ्यांसाठी बऱ्याच अंशी लाभदायी ठरला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदाने त्या सरकारने उपलब्ध करून दिली असल्याने हा वर्ग खूश आहे. याच आधारावर हा पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनण्याची तयारी करीत आहे. त्यांनी त्यासाठी पहिले सीमोल्लंघन महाराष्ट्रात करायचे योजले आहे. या पक्षाने त्यासाठी आधी आपल्या पक्षाचे नावही अधिक व्यापक बनवले आहे.
“तेलंगणा राष्ट्र समिती’चे नाव त्यांनी “भारत राष्ट्र समिती’ असे केले आहे. एखाद्या प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल सुरू करण्यात कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण त्यांना महाराष्ट्रात कितपत थारा मिळेल हे पहावे लागेल. महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी आम आदमी पक्षासारखे पक्षही धडपड करीत आहेत. इथल्याच मातीतल्या पक्षांनाही येथे आपले फार भरीव अस्तित्व निर्माण करण्यास अजून पुरेसे यश आलेले नाही. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांच्या नेत्यांविषयी राज्यात मोठे औत्सुक्य आहे. राज ठाकरे यांच्या भाषणशैलीलाही मोठा चाहता वर्ग आहे. लोक त्यांच्या सभांना मोठी गर्दी करतात, पण अजून या पक्षाला येथे आपले पाय रोवता आलेले नाहीत. अशीच काहीशी गत राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही आहे. अर्थात, मनसेच्या तुलनेत या पक्षाला मोठा जनाधार असला तरी आणि त्यांच्याकडे शरद पवारांसारखे मोठे नेते असले तरी अजून इतक्या वर्षात महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना महाराष्ट्रात एकहाती सत्ता कधीच दिलेली नाही, ही बाबही ध्यानात घ्यावी लागेल.
आजवरच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ 50-55 च्या आसपासच राहिले आहे. त्यांना आजवर एकदाही शंभरीसुद्धा गाठता आलेली नाही. त्या खेरीज शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टींचा पक्ष, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, असे अनेक पक्ष येथे कार्यरत आहेत. मध्यंतरी विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती नावाचा पक्षही येथे अस्तित्वात होता. आता शिवसेनेचाच दुसरा गटही अस्तित्वात आला आहे. अशी सारी विविध पक्षांची येथे सरमिसळ झाली असताना भारत राष्ट्र समितीची किती डाळ शिजणार हा औत्सुक्याचा विषय ठरतो आहे. पण त्या पक्षाचे नेते पूर्ण तयारीनिशी येथे उतरले आहेत, हे मात्र चांगलेच जाणवते आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत त्यांनी मोठ्या प्रमाणावर जाहिरातीही केल्याचे पहायला मिळते आहे. अगदी पुण्यासारख्या शहरातही त्यांचे “अब की बार किसान सरकार’ अशी टॅग लाइन असलेले फलक पाहायला मिळाले आहेत. अन्य पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना चुचकारण्यासाठी बीआरएसचे पथक महाराष्ट्रात कार्यरत आहे. आजच पंढरपूरच्या भगीरथ भालके यांनी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील नांदेडसारख्या परिसरातही त्यांनी या आधीच शेतकरी मेळावे आयोजित करून आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केली आहे. तेथीलही काही पक्षांचे कार्यकर्ते फोडण्यात त्यांना यश आले आहे.
सध्या ते जमवाजमव करण्यात व्यस्त आहेत. त्यांचे महाराष्ट्र स्तरावरील पदाधिकारी अद्याप जाहीर व्हायचे आहेत. बहुधा भाजप किंवा अन्य पक्षांतील काही वजनदार नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात आल्यानंतर ते हे पदाधिकारी जाहीर करतील. हा पक्ष सध्या तरी भाजपच्या विरोधातील पक्ष म्हणून गणला जातो आहे. तथापि, भाजपच्या विरोधात साकारल्या जाणाऱ्या आघाडीत त्यांनी सहभाग नोंदवलेला नाही. पाटण्यात झालेल्या सतरा प्रमुख राजकीय पक्षांच्या बैठकीत बीआरएस पक्ष अनुपस्थित होता. त्यांना भाजप आणि कॉंग्रेसला समान अंतरावर ठेवायचे आहे. त्यामुळे “एकला चलोरे’च्या भूमिकेत सध्या ते दिसत असले तरी भाजपला जेव्हा गरज निर्माण होईल त्यावेळी ते तिकडेही जाऊ शकतात. पण त्याचा नेमका अंदाज अजून आलेला नाही. मध्यंतरी भाजपने तेलंगणातही “ऑपरेशन कमळ’ राबवून चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण तो राव यांनी हाणून पाडला. नुसता हाणूनच पाडला नाही तर या “ऑपरेशन कमळ’चे स्टिंग ऑपरेशन करून आमदारांना मोठमोठ्या रकमा देऊन कसे फोडण्याचे प्रयत्न केले गेले याच्या सीडी त्यांनी तयार करून देशाचे सरन्यायाधीश आणि विविध मीडिया हाउसेसना पाठवले होते.
चंद्रशेखर राव बधत नाहीत पाहिल्यानंतर त्यांच्या मुलीचा दिल्लीतील दारू घोटाळ्याशी संबंध जोडून त्यांच्यावर ईडीचे छापेही घालण्यात आले होते. त्यानंतर चंद्रशेखर राव हे नरमल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अगदी ऐनवेळी ते भाजपप्रणित एनडीए बरोबरही जाऊ शकतात. ही त्यांची भविष्यातील राजकीय रणनीती असल्याने बीआरएस हा भाजपची “बी टीम’ असल्याची ओरड कॉंग्रेसने आतापासूनच सुरू केली आहे. ते काहीही असले तरी हा पक्ष महाराष्ट्रात हातपाय पसरू लागला आहे, हे वास्तव आहे. शेतकरी ही आपली वोट बॅंक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे हे खरे आहे; पण केवळ शेतकरी केंद्रित राजकीय पक्षाला महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात किती यश मिळेल, हे पहावे लागेल. महाराष्ट्रात शहरी किंवा निमशहरी भाग मोठा आहे. येथील सुमारे 60 टक्के मतदार या भागात राहतात, असे म्हणतात. मग या मतदारांना शेतकऱ्यांसाठीच कार्यरत राहू पहाणाऱ्या पक्षाविषयी किती आत्मियता असेल, हेही पहावे लागणार आहे. महाराष्ट्रात राजकारणाची बजबजपुरी माजली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षात एकाचवेळी अनेक दिग्गज नेते कार्यरत आहेत. ज्यांना त्यांच्या मूळ पक्षात डावलले जाण्याची शक्यता आहे, त्यांच्यासाठी राज्यात हा नवीन पर्याय असू शकतो. पण महाराष्ट्र असा सहजासहजी कोणाच्या हातात जात नाही, त्यासाठी येथे वर्षानुवर्षे टिकून राहून आपली विश्वासार्हता जपावी लागते. इतका संयम या पक्षाकडे आहे काय, हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे.