बारामती – राज्यातील सर्वच विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, गेली 20 वर्षांपासून रखडलेल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराकडे साकडे घालण्यासाठी सांगलीहून बारामतीत पायी चालत आलेली शिक्षक दिंडी शरद पवारांची भेट न होताच दुसऱ्यावेळी पदरी निराशा पडल्यामुळे बारामतीमधून परतली. त्यामुळे पुन्हा शिक्षकांमध्ये आक्रोश पहायला मिळाला.
शिक्षक दिंडी बारामतीत दाखल होताच सकाळपासून दिंडीला अडविण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. याअगोदर (दि.7) सप्टेंबर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी शिक्षक दिंडी पायी चालत सांगलीहून बारामतीला निघाली होती. दरम्यान, बारामती तालुक्यात जनता कर्फ्यूमुळे बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगवी (ता. बारामती) येथील नाकाबंदीदरम्यान दिंडी रोखली. शरद पवार व अजित पवार यांची खासगी घरे असल्याने आपल्याला आंदोलन करता येणार नसल्याचे सांगत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्याची विनंती केली होती. यावेळी शिक्षकांनी ठिय्या मांडून जनता कर्फ्यू संपल्या नंतर 22 सप्टेंबर रोजी पुन्हा पवार यांना भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगत परतीचा रस्ता धरला होता,
कर्फ्यू संपल्यावर पुन्हा आज शिक्षक दिंडी बारामतीत दाखल झाली. यावेळी प्रशासकीय भवनसमोर त्यांनी ठिय्या मांडला. बारामती पोलिसांनी त्यांना विरोध दर्शविला. सर्वांना अटक करण्याच्या सूचना बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व शहर पोलिसांकडून देण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. हा विषय राज्य पातळीवरील असल्याने मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन करा, किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आल्यानंतर त्यांना निवेदन देण्याच्या सूचना कांबळे यांनी शिक्षकांना केली. दरम्यान, मागण्यांसाठी आंदोलक ठाम होते.
राज्यातील तब्बल 60 हजाराहून अधिक शिक्षकांना त्यांच्या हक्काचा पगार मिळवून देण्यासाठी ठाण मांडून आहेत. यापुढे आमच्या जीवितास काहि धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी राज्यशासन जबाबदार राहील असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे. यावेळी विनाअनुदानित शाळा कृतीसमितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, प्रमोद पाटील, पी. आर. पाटील, विलास खांडेकर, संतोष जत्ते, सावता माळी, गणेश लांडगे, वैजनाथ चाटे, प्रेमचंद शिंदे, रोहित चव्हाण, सचिन पाटील, संभाजी आडूरकर उपस्थित होते.