चहाची दुकाने उघडा साहेब; सगळेच दारू घेत नाहीत
चऱ्होली – चहा आणि पुणेकर यांचे अतूट नाते आहे. चहाशिवाय पुणेकरांचा दिवस सुरू होत नाही. पण गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे छोटी मोठी चहाची दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. नुकतेच तिसऱ्या टप्प्यात शासनाने आर्थिक व्यवस्थेकडे लक्ष केंद्रित करीत दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे मद्यपान करणाऱ्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला. पण असे
असतानाच दुसऱ्या बाजूला अमृततुल्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चहाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
चहाची दुकाने पण उघडा साहेब; दारू सगळेच पीत नाहीत, आम्ही चहा प्रेमीही अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यास तयार आहोत, दारूला चहाची सर कुठे, चहा पिऊन बघा दारू विसरून जाल, चहा म्हणजे आपलेपणा, चहाप्रेमी चहाला अमृताची उपमा देतात, म्हणून चहाच्या दुकानांना अमृततुल्य म्हटले जाते. चहा पिणारा दारू पिणार नाही; पण दारू पिणारा चहा पिल्याशिवाय राहणार नाही. असा टोलेबाजीचा भडीमार सध्या चहाप्रेमींकडून सोशल मीडियावर होऊ लागला आहे.
चहा हे पाण्यानंतर जगात सर्वाधिक प्रमाणात पिण्यात येणारे पेय आहे. विविध चहाचे ब्रॅंड पुण्यासह महाराष्ट्रामध्ये जोमाने सुरू आहेत. याठिकाणी चहाप्रेमींसाठी तंदुरी चहा, इराणी चहा, बासुंदी चहा, लेमन टी, ब्लॅक टी, काश्मिरी कावा अशा विविध प्रकारची चहाची सेवा दिली जाते. या कट्ट्यावर रंगणारी गप्पांची मैफील बंद झाल्याने चहाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.
व्यावसायिक अडचणीत
एवढी मोठी गुंतवणूक करून उभारलेली अमृततुल्य बंद असल्याने महिन्याची लाखो रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या समस्या व्यावसायिकांनाही सतावू लागल्या आहेत.