भारतीय क्रिकेटमध्ये काळानुरूप झालेले बदल व त्याचे परिणाम आपण पाहातच आहोत. आता टी-20 क्रिकेटमुळे वेगवान क्रिकेट पाहायला मिळते; पण एक काळ असा होता की, कसोटी सामना पाहण्यासाठी झुंबड उडायची. त्याकाळी आयपीएल वगैरे नव्हते; पण कसोटीचा दर्जा जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रिय होता.
आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने सुरू केली व पहिल्याच मोसमापासून खेळाडूंना तसेच चाहत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चीअर गर्लचा धांडगधिंगादेखील प्रेक्षकांनी अनुभवला. मात्र, खूप वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये टी ब्रेक असतो त्यावेळी खेळाडूंना चहा किंवा कॉफी देण्यासाठी चक्क टी गर्ल मैदानात यायच्या. या लेखात वापरलेले हे छायाचित्र आहे 1938 साली इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका कसोटी सामन्याचे. त्यात या टी गर्ल खेळाडूंना तसेच पंचांना चहा देताना दिसत आहेत.
काळ बदलला तसे क्रिकेटही बदलले. टी गर्लची जागा आता चीअर गर्लनी घेतली. आयपीएल स्पर्धेत जरी आता गेल्या काही वर्षांपासून त्या गायब झाल्या असल्या तरी जगभरात विविध देशांत होत असलेल्या टी-20 लीग स्पर्धेत या चीअर गर्ल आजही दिसतात.
भारतीय क्रिकेटही अन्य देशांबरोबर कमालीचे बदलले. बिशनसिंग बेदी ते मंदीरा बेदी हा बदल आपण अनुभवलाच आहे. या छायाचित्रातून आपण टी गर्ल ते चीअर गर्ल हा बदलही आता दिसून येतो.
पूर्वीच्या काळी खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी चाहते मैदानावर गर्दी करायचे. खरेतर या प्रेक्षकांना गर्दी नव्हे तर दर्दी म्हटले जायचे. आयपीएल सुरू झाल्यावर कामगिरी पाहण्याबरोबरच या परदेशी चीअर गर्लला पाहण्यासाठी दर्दी नव्हे गर्दी होऊ लागली. करोनाचा धोका जगभरात पसरला व विविध देशांच्या क्रिकेट मंडळांना जो तोटा झाला त्यात या चीअर गर्ल गायब झाल्या.
कारण त्यांचे मानधन, त्यांचे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणे, वाहतूक व्यवस्था यांचा खर्च का करावा असा विचार पुढे आला व निदान आयपीएल मधून या चीअर गर्ल गायब झाल्या. पण त्या काळी क्रिकेटकडे व खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता व आज कसा आहे हे स्पष्ट करण्यासाठी सदरचे छायाचित्र पुरेसे आहे.