पणजी/कोची/ बंगळुरू/ मुंबई, – तौक्ते या चक्री वादळाने कर्नाटक, केरळ आणि गोव्यामध्ये हाहाकार माजवला. यात सहा जणांचे बळी नोंदवले गेले असून, कर्नाटकात 73 गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. गोव्यात पावसाने सकाळपासून धुमाकूळ घातला असून, पणजीत शेकडो झाडे कोसळली आहेत.
महाराष्ट्रातही किनारावर्ती भागात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, या वादळाची तीव्रता वाढल्याने त्याचे रूपांतर गंभीर वादळात झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिली आहे. येत्या 12 तासांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ते गुजरातमधील पोरबंदर ते महुआ या दरम्यान मंगळवारी सकाळी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
जरी हे वादळ गुजरातकडे सरकत असले तरी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनारावर्ती भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि जोरदार वारे वाहत आहेत. गोव्याला त्याचा जबरी तडाखा बसला.
केरळमधील मल्लपुरम, एर्नाकुलम आणि इडुक्की या तीन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, तर तर अन्य जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. अरबी समुद्रात हे वादळ जशे मार्गक्रमण करू लागेल तसतसे मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्तकेली आहे.
तीनही राज्यांच्या किनारावर्ती भागात येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील सूचना येईपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
येत्या 24 तासांत केरळमध्ये या वादळाचा प्रभाव राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात सरासरी 145 मिमी पाऊस पडला आहे.
कोची आणि रिमेड येथे 200 मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या विशेषत: मनीमला आणि अचनकोविल नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. पुनर्वसन केंद्रात जाताना नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, औषधे, प्रीस्क्रिप्शन प्रमाणपत्रे आणि महत्त्वाची कागदपत्रे सोबत बाळगावीत अशी सूचना त्यांनी केली आहे.
केरळ
एर्नाकुलम आणि कोझीकोडे येथे या वादळाने दोन जणांचा बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांत सुसाट्याचा वारा आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सखल भागातील अनेक घरे आणि रस्ते पाण्याखाली गेले असून, शेकडो वृक्ष उन्मळून पडले आहेत. वीजपुरवठाही अनेक भागात खंडित झाला आहे.
कर्नाटक
तौक्ते वादळाने कर्नाटकातील चार जणांचा मृत्यू झाला. सहा जिल्ह्यांतील 73 गावांना याचा जबरी फटका बसला आहे. यातील तीन किनारावर्ती आहेत, तर अन्य तीन जिल्हे पर्वतीय क्षेत्रातील आहेत. आपण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू केल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.
महाराष्ट्र
तौक्ते वादळाने तडाखा दिलेले आणखी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र. येथील परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात उशिराने मुसळधार वृष्टी होण्याचा अंदाज आहे. मुंबई महापालिकेने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून तीन करोना केअर सेंटरमधील 580 बाधित अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा
या वादळाने गोव्यालाही रविवारी सकाळी तडाखा दिला. सर्वात अधिक फटका पणजीला बसला. जोरदार वारे आणि पावसाने अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक झाडे उन्मळून पडली. रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. वाहनांवर झाडे पडल्याने शेकडो वाहनांचे नुकसान झाले.