मुंबई – तौक्ते चक्रीवादळ येत्या 24 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सध्या हे चक्रीवादळ मुंबईच्या दक्षिणेस 450 किलोमीटरवर असून पुढे गुजरातच्या दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला 840 किमी अंतरावर आहे. ते येत्या 24 तासांत गुजरातकडे सरकण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोकण किनारपट्टी आणि गोव्यात 16 मे रोजी काही भागात तसेच घाटमाथ्यावर मूसळधार ते अतिमुसळधार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी 17 मे रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या दक्षिण भागात 16 मे रोजी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील तर 17 मे पासून 18 मेच्या सकाळपर्यंत किनारपट्टीच्या उत्तर भागात वाऱ्याचा वेग ताशी 65 ते 75 किमी असू शकतो. तो वाढत तो ताशी 85 किलोमीटर इतका वाढू शकतो असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्राची किनारपट्टी, खासकरुन किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागातला समुद्र येत्या 24 तासात खवळलेला असेल. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात असतील त्यांनी तातडीने किनाऱ्यावर यावे अशी सूचना देण्यात आली आहे.