आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांना एकत्र आणणार : दर मंगळवारी होणार आढावा बैठक
पुणे – जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी आणि आरोग्य यंत्रणा व्यवस्था चांगल्या दर्जाची करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “आरोग्य टास्कफोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत आरोग्य यंत्रणेशी संबंधित सर्वांना एकत्र आणून दर आठवड्याला आरोग्य विभागात झालेले बदल, तातडीचे निर्णय, औषध पुरवठा आदी निर्णय ही समिती घेणार आहे.
जिल्ह्यात अनेक आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाली आहे. तसेच, अनेक केंद्रांत डॉक्टर उपलब्ध नसतात किंवा औषधांचा तुटवडा असतो. यामुळे ग्रामीण भागात चांगली आरोग्य सुविधा मिळेल यांची शाश्वती नसते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अनेक गैरप्रकारही सर्वसाधारण सभेत गाजले आहे. नागरिकांना चांगले आरोग्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने नुकताच पदभार स्वीकारलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी अकोला येथे राबविलेला आरोग्य टास्कफोर्सचा उपक्रम आता पुणे जिल्ह्यातही राबविला जाणार आहे.
यासाठी आरोग्य टास्कफोर्स कमिटीची स्थापना करण्यात आली असून आयुष प्रसाद हे त्यांचे अध्यक्ष आहेत. तर जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी, मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी, तालुक्याचे आरोग्यसेवक, समन्वयक, रुग्णवाहिका, लॅब तपासणीस, आरोग्य विभागातील साधनांची दुरुस्ती करणारे अशा आदींचा या समितीत समावेश आहे.
या समितीद्वारे आरोग्य विभागाला येणाऱ्या अडचणी, औषध पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणी, नागरिकांच्या तक्रारी आदी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. या सर्वांवर आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्वतः लक्ष ठेवणार आहे. यामुळे आरोग्य विभागाला वेगाने निर्णय घेता येणे शक्य होणार आहे.
आरोग्य टास्कफोर्स समितीद्वारे आरोग्य यंत्रणेशी संबंधित सर्वांना एकत्र आणून त्यांच्यातील समन्वय वाढवला जाणार आहे. यामुळे नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे. तसेच त्यांच्या येणाऱ्या तक्रारी या दर आठवड्याला सोडवता येणार आहे. बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण तसेच साथींच्या आजारांचे मॉनिटरींग या समितीद्वारे करण्यात येणार आहे.
– प्रमोद काकडे, आरोग्य आणि बांधकाम सभापती
जिल्ह्यात चांगली आरोग्य यंत्रणा देण्यासाठी अकोला जिल्ह्यात आरोग्य टास्कफोर्स हा उपक्रम राबविला होता. तो उपक्रम आता जिल्ह्यातही राबविला जाणार आहे. यामुळे आरोग्य केंद्रातील सोयी आणि सुविधा चांगल्या होणार आहे. यासाठी दर मंगळवारी बैठक घेतली जाणार असून त्याद्वारे समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी