Atul Bhatkhalkar । महाविकास आघाडीच्या पालघर येथील उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे पालघरला आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. चीन-पाकिस्तानसारखे शत्रू मोकाट सुटले आहेत. मात्र, इकडे उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. उद्धव ठाकरेला संपवून दाखवाच, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले आहे. त्यावर आता भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांना पालघरला जाण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय जनतेच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या विजनवासात गेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली आहे.
पालघरमध्ये जाण्याचा नैतिक अधिकार नाही Atul Bhatkhalkar ।
जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं. तेव्हा उद्धव ठाकरे पालघरला का गेले नाहीत? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे उद्धव ठाकरे घरात लपून बसले होते. मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंची दगड मारून ठेचून हत्या करण्यात आली. त्या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करायला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यांना पालघरमध्ये जाण्याचा आणि बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
तुम्ही आधीच संपलेले आहात Atul Bhatkhalkar ।
संपवून दाखवण्याची भाषा करण्याची गरज काय? उद्धव ठाकरे तुम्ही आधीच संपलेले आहात. मोदीजींना 400 पेक्षा अधिक जागा निवडून देण्यासाठी भाजप आणि महायुती काम करत आहे. उद्धव ठाकरे स्वतःच्या विश्वात मग्न आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना संपवणे आमच्या डोक्यात सुद्धा नाही ना जनतेच्या डोक्यात आहे. जनतेच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या विजनवासात गेले आहेत, असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पालघरच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीचे सरकार येणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी अभिमानाने अगदी आत्मविश्वासाने सांगतो की, इंडिया आघाडी 300 पार करून येणार म्हणजे येणार आहे.असा विश्वास व्यक्त केला.