सातारा – जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, वाई, पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर, कराड या तालुक्यांतील 22 गावे 35 वाड्या वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. फलटण, खंडाळा या तालुक्यांत अद्याप एकही टॅंकर सुरू नसल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी दिली.
माण तालुक्यात चार गावे, 17 वाड्यांमधील 4307 लोकांना तीन टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. पांगरी नऊ वाड्या, वडगाव चार वाड्या, वारुगड पाच वाड्या, बिजवडी गावठाणात टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. खटाव तालुक्यात गारवडी, आवळे पठार, अनफळे याठिकाणी 1122 लोकांना व 758 पशुधनासाठी एका टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे.
कोरेगाव तालुक्यात भंडारमाची, भाटमवाडी, शेल्टी या तीन गावांत टॅंकरने पाणीपुरवठा होत असून या पाण्यावर 1763 ग्रामस्थ आणि 1315 पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात मांढरदेव, बालेघर, बोपर्डी, धनगरवाडी,गडगेवाडी या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा होत असून 2787 ग्रामस्थ आणि 1276 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी, अंब्रूळकरवाडी (भोसगाव) चव्हाणवाडी (नानेगाव), शिद्रुकवाडी, शिद्रुकवाडी (वरची), मुद्रुलवाडी (कालगाव), झाकडे, फडतरवाडी (घोट) या गावातील 3634 ग्रामस्थ आणि 1701 पशुधनासाठी टॅंकर सुरू आहे.
सातारा तालुक्यात आवाडवाडी, निकमवाडी, बौध्दवस्ती, पिसाणी, चोरगेवाडी या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा होत असून 740 ग्रामस्थ आणि 185 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. कराड तालुक्यात बामणवाडी, पवारवाडी, शिबेवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. 740 ग्रामस्थ आणि 185 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. महाबळेश्वर तालुक्यात आचली आणि भीमनगर या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. येथील 464 ग्रामस्थ आणि 60 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. जावळी तालुक्यात काळोशी, बालदारवाडी, खिलारमुरा, ओखवडी मुरा, रुईघर (गणेशपेठ) येथे 3680 ग्रामस्थ आणि 1513 पशुधनासाठीटॅंकरने पाणी पुरवठा होत आहे.