राजगुरूनगर -खेड तालुक्यात 468 शाळांमध्ये वितरित होणाऱ्या शाळेला पोषण आहारातील तांदळाच्या वजनात घट येत आहे. त्यामुळे पुरवठादार संस्था व ठेकेदार यांच्या गैरकारभारामुळे चिमुकल्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याचे वास्तव उघड झाले आहे. शासनाकडून याची दखल घेतली जाणार का असा सवाल पालक, शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.
खेड तालुक्यात 468 शाळांमधील पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार वितरित केला जातो. यात तांदूळ हरभरा, मूगडाळ पुरवण्यात येते. करोनाच्या पूर्वी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जात होता; मात्र करोनामुळे हा आहार शिधा स्वरूपात विद्यार्थ्यांना दिला जात आहे. 154 कार्यदिवसांकरिता प्रति विद्यार्थी (1 ते 5 वी) 4 किलो 150 ग्रॅम मूगडाळ, हरभरा 4 किलो 100 ग्राम तर तांदूळ 15 किलो 400 ग्रॅम दिला जात आहे. (6 वी ते 8 वी) मूगडाळ 6 किलो 200 ग्रॅम, हरबरे 6 किलो 150 ग्रॅम आणि तांदूळ 23 किलो 100 ग्रॅम दिला जातो.
या महिन्यात पोषण आहार आला त्या-त्या ठिकाणी त्याचे वजन करून शिक्षकांनी उतरून घेतला. यामध्ये तांदळाच्या 50 किलोच्या पोत्यात तब्बल 7 किलो पर्यंत कमी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून तक्रारी झाल्या; मात्र हे सत्र पुढे सुरूच आहे. आज ठेकेदाराकडून पाठवलेल्या शालेय पोषण आहारातील तांदळाचे वजन करून शिक्षकांनी खाली उतरून घेतला त्यात भयानक माहिती समोर आली.
50 किलो तांदळाच्या सीलबंद पोत्याचे वजन 42 ते 45 किलोच भरले. राजगुरूनगर येथील थिगळस्थळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तांदूळ उतरून घेताना पत्रकार, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शाळेच्या शिक्षकांसमोर तांदळाच्या पोत्याचे वजन करून घेतले असता हा प्रकार समोर आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत संबंधित संस्था ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.
तांदूळ, मूगडाळ, हरभरा उतरून घेताना त्याचे वजन करून घेण्याच्या सूचना सर्व शाळांना केल्या होत्या. तांदुळाच्या पोत्यात घट येत असल्याची कुणकुण होती, त्यामुळे आता आलेल्या तांदुळाचे वजन करून शाळांमध्ये उतरविण्यात आले. त्यात सात 50 किलोमागे 7 किलोपर्यंत वजनात घट येत आहे. ही घट तांदूळ पुरवठा करणाऱ्या संबंधित संस्था ठेकेदारास कळवली आहे ते घट आलेला तांदूळ देणार आहेत; मात्र शाळा व्यवस्थाप समितीच्या तक्रारी नुसार संबंधितांची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. याबाबत संबंधितांना पत्र देण्यात येणार आहे.
– डी. आर. भारमळ, अधीक्षक, शालेय पोषण आहार