वडगाव मावळ, दि. 1 – मागील 43 दिवसांपासून कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करून न्याय मिळवण्यासाठी 236 कामगार लढा देत आहेत. एल अँड टी कंपनीतील कामगारांच्या हक्कासाठी त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे.त्यासाठी आता लढा उभा करण्याची वेळ आली आहे. त्याकरिता आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी (दि.2) तळेगाव एमआयडीसी बंदची हाक दिली आहे.
एल अँड टी कंपनीमध्ये काम करणारे स्थानिक भूमिपुत्र आपल्या हक्कासाठी पुणे कामगार आयुक्तालय येथे आंदोलन करीत आहेत.त्यांना अजुन न्याय मिळालेला नाही. कामगार आयुक्तालय आणि एल अँड टी कंपनी व्यवस्थापन यांच्या बैठकीतून मार्ग निघेल अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु स्थानिक भूमिपुत्रांना वाऱ्यावर सोडून कंपनी चालवून दाखवू अशी आडमुठेपणाची भूमिका कंपनी व्यवस्थापन घेत आहे. याला विरोध करण्यासाठी आमदार शेळके यांनी एमआयडीसी बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. स्थानिकांच्या हक्कांसाठी या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भूमिपुत्रांना हक्क मिळवून देऊ ;
कंपन्या स्वतःच्या हितासाठी, नफेखोरीसाठी जर अशा पद्धतीने काम करणार असतील, तर अशा कंपन्यांच्या विरोधात लढा उभा करण्याची वेळ आता आली आहे.भविष्यात कुठल्याही कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरून मुजोरपणा करण्याची हिंमत दाखवू नये.एक डिसेंबर पर्यंत एल अँड टी कंपनीच्या व्यवस्थापकांनी कामगार बांधवांना योग्य न्याय दिला नाही.तर दोन डिसेंबरलासर्व पक्ष, संघटना व स्थानिक भूमिपुत्रांच्या उपस्थितीत तळेगाव एमआयडीसी बंद करण्यात येईल, असा इशारा आमदार शेळके यांनी दिला आहे.
खासदार बारणेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
भारतीय कामगार सेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. तरी, देखील कामगारांना न्याय मिळावा यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे मैदानात उतरले आहेत. कामगार माझ्या मतदारसंघातील आहेत. कामगार कोणत्या पक्षाचे काम करतात, यापेक्षा ते सर्वसामान्य कामगार आहेत. त्यांच्यावर कंपनी प्रशासनाकडून अन्याय होत आहे. कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही. याबाबत उद्योगमंत्री, कामगार मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे लवकरच या कामगारांना दिलासा मिळेल,असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.