मुंबई – मराठा आरक्षणाबाबत 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत ठोस भूमिका न घेतल्यास रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. याप्रसंगी आम्ही करोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा थेट इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला आहे. तसेच मराठा समाजाच्या प्रश्नासाठी दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याची त्यांनी मागणी केली.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण प्रश्नी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मला आज स्पष्ट सांगायचे आहे. 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. त्या दिवशी शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. जर 6 जूनपर्यंत यावर काही कारवाई केली नाही. तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून जाहीर करू. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का?
त्यामुळे 6 जूनआधी आम्हाला बोलावून निश्चित असा काही कार्यक्रम तुम्ही दिला नाही, तर नंतर आम्ही कोविड-बिविड बघणार नाही. मी स्वत: 5 मे रोजी निकाल लागला तेव्हा सगळ्यांना शांत ठेवले. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता. पण आम्ही किती शांत बसायचं? असे ते म्हणाले.
या आंदोलनात लोकांना वेठीला धरले जाणार नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय, या गोष्टी तुम्ही मार्गी लावा. नाहीतर मी कोविड वगैरे काहीही बघणार नाही. हा संभाजीराजे आघाडीवर असणार तिथे. समाजाला आम्हाला वेठीला धरायचे नाही.
लोकांना रस्त्यावर घेऊन उतरायचे नाही. 6 तारखेला लोकांना नाही तर सगळ्या आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार. आता लोकांची ही जबाबदारी नाही, तर या सगळ्या खासदार, आमदार, मंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद इथल्या सर्वांनी यायला हवे, असे ते म्हणाले.
दिल्लीत गोलमेज परिषद
दिल्लीला मराठा समाजाची गोलमेज परिषद होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व आमदार-खासदारांना, मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षनेत्यांना मी स्वत: आमंत्रण देणार आहे. ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. मराठा समाजाला तुच्छ लेखू नका. आता वेळी आली ती कृती करण्याची. तसेच, त्यासोबत किमान दोन दिवसांचं मराठा समाजावर अधिवेशन व्हायला हवे. अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप करायचे नसून समाजाच्या भल्यासाठी काम करा. आम्ही वर गॅलरीत बसून त्यावर लक्ष ठेऊ. नाहीतर सांगून टाका की या मराठा समाजाचं आम्हाला मतदानच नको आहे, असे आव्हानदेखील संभाजीराजे यांनी दिले.