वाई – वाईचे तहसीलदार रणजीत भोसले हे आपल्या शासकीय कामानिमित्ताने पाचवड (ता. वाई) येथे जात होते. यावेळी व्याहळी येथे दोन दुचाकीस्वार जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली व त्यांना स्वतःच्या गाडीत घेतले आणि वाईच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले. तहसिलदारांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे या अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. तहसिदारांच्या या संवेदनशीलतेचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
व्याहाळी गावच्या हद्दीत पाचवडहुन वाईला येणारे पंचायत समिती कर्मचारी कपील गायकवाड (वय 32) व साताराला जाणारे पोलीस मुख्यालयात नेमणूक असणारे कर्मचारी योगेश जगदाडे (वय 33) यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली आणि दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्याकडेलाच पडले होते. याचवेळी तहसीलदार रणजित भोसले शासकीय कामासाठी वाईहून पाचवडला निघाले होते. त्यांना अपघातग्रस्त दुचाकी आणि जवळ जखमी अवस्थेत पडलेले दोघेजण दिसले.
त्यांनी चालकाला तात्काळ गाडी थांबविण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः खाली उतरून जखमींची विचारपूस करत त्यांना स्वत:च्या गाडी घेतले आणि वाई येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच गाडीतूनच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. तहसीलदार भोसले यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. रणजित भोसले यांच्या संवेदनशीलतेचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.