ढाका – विराट कोहलीने केलेल्या फेक फिल्डिंगवरून आता बांगलादेश क्रिकेट मंडळही कार्यरत झाले असून ते याची तक्रार थेट आयसीसीच्या शिस्तपालन समितीकडे करणार आहे.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नुरुल हसनने लिंटन दाससह धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सीमारेषेवरून खरेतर अर्शदीप सिंगने चेंडू थ्रो केला होता. मात्र, त्याचवेळी कोहलीने जणू चेंडू आपल्याच हातात असल्याचे चित्र निर्माण करत फेक थ्रो केला होता.
यावरूनच नुरुलने कोहलीवर फेक फिल्डिंगचा आरोप केला आहे. आयसीसीच्या 41.5 या नियमांतर्गत असे वर्तन नियमाचा भंग करणारे ठरते. मात्र, ही घटना घडली तेव्हा मैदानावरील पंच तसेच सामनाधिकारी यांच्यापैकी कोणाच्याही लक्षात आली नाही.
हा सामना बांगलादेशने गमावल्यावर कोहलीवर झालेल्या आरोपांची चर्चा जास्त सुरू झाली. आता त्यात संघव्यवस्थापनाला पाठिंबा देत बांगलादेश मंडळही कोहलीची तक्रार करणार असून आता आयसीसी काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.