माधव विद्वांस
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अग्रणी रामानंद तीर्थ यांची आज जयंती. त्यांनी संन्यास घेतला होता, त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर. त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे 3 ऑक्टोबर 1903 रोजी झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी दोन मुलींनंतर संन्यास घेतला पण पत्नीची संमती घेतली नाही. तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना परत गृहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर त्यांना हे पुत्ररत्न झाले. सिंदगी येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. अमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. व “लोकशाहीचा विकास’ हा प्रबंध लिहून एम.ए. पदवी संपादन केली. दरम्यान लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यांनी त्या वेळी “माझे सर्व उर्वरित जीवन मी मातृभूमीच्या चरणी वाहत आहे, सर्व सुखांचा त्याग करून मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन’, अशी प्रतिज्ञा केली. त्यानंतर 1926 मध्ये मुंबईतील कामगार नेते ना. म. जोशी यांच्या स्वीय साहाय्यकपदी ते रुजू झाले.
त्यावेळी ना. म. जोशींनी स्वामीजींना कामगारविषयक विधेयकाची माहिती घेण्यासाठी ऐन हिवाळ्यात दिल्लीला पाठविले. दिल्लीच्या थंड हवामानामुळे त्यांना पक्षाघाताचा झटका आला व त्यात त्यांना दीड वर्ष आजारपणात घालवावे लागले, आजारातून उठल्यावर त्यांनी आध्यात्माची कास धरली आणि 14 जानेवारी 1930 रोजी आपल्या जन्मनावाचा त्याग करून भिक्षुकी अंगीकारली. त्यानंतर 14 जानेवारी 1932 रोजी हिप्परगा (तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद) येथे लखनौस्थित स्वामी नारायण यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. गुरूंनी त्यांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ ठेवले. तत्पूर्वीच 1930 मध्ये राष्ट्रीय विचारांच्या प्रचारार्थ हिप्परगा येथे शिक्षण संस्था काढली होती. दरम्यान, आंबेजोगाई येथे योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षकाची नोकरी धरली. पुढे ते मुख्याध्यापकही झाले. त्यानंतर हैदराबादमधील जनता शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात स्वामीजींनी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर घणाघाती टीका केली. या भाषणानंतर सर्व सहकाऱ्यांनी स्वामीजींना हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याच सुमारास स्वामीजींनी आंबेजोगाई सोडून हैदराबादला प्रयाण केले.
स्वामीजींनी कॉंग्रेसांतर्गत स्वतंत्र संघटना स्थापन केली आणि निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आंदोलन छेडले. त्यांना स्वातंत्र्यापर्यंतच्या दहा वर्षांच्या काळात अनेक वेळा शिक्षा झाली. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु निजामाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणार नाही असे घोषित केले तथापि संस्थानातील जनतेस स्वामीजींनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले. 2 जानेवारी 1972 रोजी त्यांचे निधन झाले.