लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षासमोर
समाजवादी पक्षाने आव्हान उभे केले आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता
पक्षातून बाहेर पडलेले स्वामी प्रसाद मौर्य एव्हाना समाजवादी पक्षात प्रवेश करणार हे निश्चित
झाले आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाची यादव-मुस्लिम मतपेढीत आता बिगर यादव
ओबीसीदेखील ज़ोडले जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाचा पुन्हा सत्तेत
येण्याचा मार्ग सुकर होईल अशी शक्यता आहे.
कामगार मंत्री असणाऱ्या मौर्य यांच्या राजीनाम्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या करड्या
नेतृत्वाखाली साचलेली वाफ बाहेर पडण्यास सुरवात झालेली आहे. आपल्याबरोबर आणखी
किमान 15 आमदार भाजपमधून बाहेर पडतील असा दावा त्यांनी केलेला आहे. भाजपच्या
अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता
आणि मौर्य यांनी चर्चेची दारे बंद करून टाकली होती.
मौर्य हे कुशवाह समाजाचे असल्याने आणि त्यांचा ओबीसींच्या मतपेढीवर प्रभाव आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या व्यूहरचनेचा फेरविचार करण्याची वेळ भाजपवर आली आहे. दुसरीकडे योगी आदित्यनाथ हे उच्च जातींचे हित साधणारे आहे असा प्रचार विरोधी पक्षांनी सुरु केला होता, आता त्याला मौर्य यांच्यामुळे बळ मिळणार असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याने समाजवादी पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मिती होण्यास बळ मिळाले आहे.
आणखी एक मुद्दा म्हणजे त्यांच्या राजीनाम्यामुळे ओबीसींमध्ये जो संदेश जायला हवा होता तो गेला आहे. त्यामुळेच राज्यातील निवडणुकीच्या व्यूहरचनेवर फेरविचार करण्याची वेळ भाजपवर आलेली आहे. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) चे संचालक आणि राजकीय विश्लेषक संजयकुमार यांच्या मते मागास जातींच्या मतांच्या आधारे निवडणुकीत एक समज तयार केला जातो. अशा स्थितीत मौर्य समाजवादी पक्षात गेले तर त्या पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे. त्यांच्या मते प्रत्येक वेळी असे होईलच याची खात्री देता येत नाही.
समाजवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्याच्या विश्लेषणानुसार मौर्य यांच्यासारखे ओबीसी समाजातील
प्रभावी नेतृत्व पक्षात येण्यामुळे सपा हा फक्त यादवांचा पक्ष आहे ही प्रतिमा बदलण्यास मदत
होणार आहे आणि त्याचबरोबर मौर्य यांचे कुशवाह समाजातील दबदबा पाहता बिगर यादव
ओबीसी आणि कुशवाह, सैनी, शाक्य या ओबीसी जातींचा पाठिंबा पक्षाला मिळण्यास मदत
होईल. त्याचबरोबर भाजपमध्ये मागासवर्गीय आणि दलित नेतृत्वाचा सन्मान ठेवला जात
नाही, असा संदेश देण्यातही मौर्य यशस्वी झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.