नवी दिल्ली – ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताबाबत संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातावरून आता आरोपा प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ओडिशा रेल्वे अपघातावरून थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. रेल्वे अपघातामागे टीएमसीचा हात असल्याचा धक्कादायक आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे.
भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, ओडिशा रेल्वे दुर्घटना हे तृणमूल काँग्रेसचे षडयंत्र आहे. ही घटना दुसऱ्या राज्यातील असताना कालपासून ते इतके घाबरलेले का आहेत? सवाल अधिकारी यांनी उपस्थित केला. सीबीआयच्या तपासाला का घाबरता? या लोकांनी पोलिसांच्या मदतीने दोन्ही रेल्वे अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले. या लोकांना दोन रेल्वे अधिकाऱ्यांमधील संभाषण कसे कळले? संभाषण कसे लीक झाले? हे सीबीआयच्या तपासात यावे. ते आला नाही तर मी कोर्टात जाईन असा इशारा देखील यावेळी अधिकारी यांनी दिला.
ममता यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी लपवल्याचा आरोप केला. सीबीआयच्या तपासावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून 12 वर्षांपूर्वी झालेल्या ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते, मात्र आजपर्यंत त्याचा निष्कर्ष लागलेला नाही.
ओडिशा रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला
ओडिशातील बालासोर जिल्ह्यात 2 जून रोजी संध्याकाळी झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातात 275 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.