नवी दिल्ली – एका न्याय्य मागणीसाठी आग्रह धरणाऱ्या खासदारांचे निलंबन करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे असा आरोप कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी हा आरोप केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल कॉंग्रेससाठी अत्यंत निराशाजनक असल्याचे लक्षात घेऊन, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या खासदारांना पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी त्यांच्या निराशेला सकारात्मक मोहिमेमध्ये बदलण्याचे आवाहन केले.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना त्या म्हणाल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आमच्या पक्षासाठी अत्यंत निराशाजनक आहेत, आमच्या खराब कामगिरीची कारणे समजून घेण्यासाठी आणि आमच्या संघटनेसाठी आवश्यक धडे घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी आधीच पुनरावलोकनांची पहिली फेरी पुर्ण केली आहे. आम्ही मोठ्या आव्हानांना तोंड देत आहोत.
तरीही, मला खात्री आहे की आमचे धैर्य आणि लवचिकता आम्हाला यातून पुढे जाण्यास उपयोगी ठरेल. आमची विचारधारा आणि आमची मूल्ये या कठीण काळात आम्हाला मार्गदर्शक प्रकाश आहेत. आमच्या नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठ्या धैर्याने अतुलनीय परिस्थितींशी लढा दिला होता हे आपण कधीही विसरता कामा नये. कॉंग्रेसजनांनी निराशा झटकून आपल्यातील सकारात्मकेला अधिक वाव दिला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सोनियांनी वाढत्या महागाईवरून केंद्रातील भाजप सरकारवरही यावेळी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की या देशातील गरीब अधिक त्रस्त आहेत आणि देशातील आर्थिक असमानता वाढत आहे. पंतप्रधान देशाच्या आर्थिक विकासाबद्दल बढाया मारत असले तरी प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजुर करून नुसताच देखावा केला.
केवळ महिलांची मते मिळवण्यासाठी त्यांनी महिलांची केलेली ही दिशाभुल आहे. संसद आणि विधीमंडळांमधील महिला आरक्षण धोरणांची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे अशी मागणीही त्यांनी केली. जम्मू आणि काश्मीरबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आणि सातत्यपूर्ण आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा त्वरित बहाल केला पाहिजे आणि तेथे लवकरात लवकर निवडणुका घेतल्या पाहिजेत.