मोरबी – गुजरातमधील मोरबी येथे झुलता पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळल्याने आतापर्यंत जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी झाल्याचे स्थानिक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच 70हून अधिक जणांना वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे. या दुर्घटनेत जवळपास 500 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पूल कोसळल्यानंतर नेमके किती जण नदीत वाहून गेले याची माहिती अद्याप समजलेली नाही. या घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. नदीत वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. नदीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आली आहे. तसेच गांधीनगर आणि बडोदावरून एनडीआरएफची तीन पथके रवाना झाली आहेत.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव दलाने आतापर्यंत सुमारे 70 हून अधिक लोकांना पाण्यातून बाहेर काढले आहे. संबंधित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काहींची प्राथमिक तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती.
गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनीही ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगाने सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचे काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरात सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची, तर जखमींना 50 हजार रुपयांची तातडीने मदत देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मोदी, शहा तातडीने सक्रिय
गुजरातमधील दुर्घटनेची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने सक्रिय झाले. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संपर्क साधून वेगवान बचाव आणि मदतकार्यासाठी सूचना दिल्या.
दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल मोदी आणि शहांनी दु:ख व्यक्त केले. मोदींनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली. त्याशिवाय, जखमींवरील उपचारांसाठी प्रत्येकी 50 हजार रूपये दिले जाणार आहेत. दुर्घटनास्थळी तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके पाठवण्यात आल्याची माहिती शहांनी ट्विटरवरून दिली.