नवी दिल्ली : देशभरात सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये काँग्रेससह अनेक पक्षाचे नेते आणि सेलिब्रेटी जोडले जात आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असणारी ही यात्रा राजस्थानमध्ये आहे. मात्र या यात्रेला केंद्र सरकारकडून स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जगभरात करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सतर्कता वाढवली असून याच पार्शवभूमीवर दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये दोन्ही नेत्यांना ‘भारत जोडो यात्रे’त कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच हे शक्य नसेल तर देशहिताच्या दृष्टीने यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.
Union Health Minister Mansukh Mandaviya y’day wrote to Congress MP Rahul Gandhi & Rajasthan CM Ashok Gehlot.
Letter reads that COVID guidelines be strictly followed during Bharat Jodo Yatra & use of masks-sanitiser be implemented; mentions that only vaccinated people participate pic.twitter.com/cRIyZz0DLY
— ANI (@ANI) December 21, 2022
“करोना महामारी ही सार्वजनिक आणीबाणी असल्याने ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात यावा,” असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच “राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर करावा आणि या यात्रेत केवळ करोना लसीकरण झालेले लोकच सहभागी होतील याची खात्री करावी. प्रवाशांना सभेच्या अगोदर आणि नंतर आयसोलेट करण्यात यावे,” असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
याच पत्रात मांडविया यांनी, जर करोना प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य नसेल तर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन देश हितासाठी ‘भारत जोडो यात्रा’ पुढे स्थगित करण्याची विनंती केली आहे.