कोल्हापूर – काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयावरून प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरी शेजारील सर्व अतिक्रमण हटवले होते. त्यानंतर छत्रपती संभाजी राजेंनी प्रतापगड झाला आता विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. संभाजी राजेंनी याबाबतचे पत्र देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले होते. आता कोल्हापूर येथील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कोल्हापूरमधील ठाकरे गटाचे संजय पवार विजय देवणे आदी शिवसैनिक विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी फावडे आणि कुदळ घेऊन निघाल्याचे वृत्त समोर आले आहे. तत्पूर्वी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. विशाळगडावरील अतिक्रमण हटवणार असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना देखील सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसैनिक विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करत आहेत. त्या ठिकाणी सुरू असणारी दारू विक्री तसेच कोंबड्या कापून पार्ट्या करणारी दुकाने काढून टाकणार असल्याचे देखील यावेळी शिवसैनिकांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले. सरकारने देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली होती.मात्र आता शिवसैनिक स्वतः विशाळगडावर जाणार असल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.