पुणे – राज्यात यंदा शेतपिकांच्या पेरण्या उशिरा सुरू झाल्या आहेत. पण, दुसऱ्या बाजूला गेल्यावर्षीच्या तुलनेत तेलबियांच्या लागवड क्षेत्रात आश्चर्यकारक वाढ नोंदवली गेली आहे. यात सर्वाधिक लागवड ही सोयाबीन आणि शेंगदाणा पिकाची करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने याबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण 47 लाख 97 हजार 42 हेक्टरवर तेलबियांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे सन 2016-17 ते 2020-21 काळात हे क्षेत्र 43 लाख 92 हजार 340 हेक्टर होते. यंदा यात विक्रमी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात विक्रमी प्रमाणात सोयाबीनचा पेरा झाला आहे. शिवाय, पीक वेळेत हाती येण्याची हमी, सरासरी उत्पन्न हाती येण्याच्या आशेने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे राहिला आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेलबियांकडे कल का?
मागील दोन-तीन वर्षांत देशभरात तेलबियांना मोठी मागणी राहिली. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे देशात तेलाचे भाव प्रचंड तेजीत राहिले. त्यामुळे यंदाही ही स्थिती निर्माण होण्याची शक्यता आणि तातडीने पीक आणि पर्यायाने पैसे हाती येण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि अन्य तेलबियांची पेरणी अधिक केली आहे.
हंगाम आणि तेलबिया उत्पादन
- खरीप : सोयाबीन, भुईमूग, तीळ, एरंड आणि कारळ.
- रब्बी : सूर्यफूल, करडई, जवस आणि मोहरी
तेलबिया-एकूण पेरा (हेक्टर)
सोयाबीन – 46,72,586
भुईमूग – 1,15,223
तीळ – 3,899
कारळ – 3,917
सूर्यफूल – 1,047
एरंड व अन्य – 2,162
तेलबिया क्षेत्र आणि भारत
भारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक पातळीचा विचार करता लागवडही 14-15 टक्के इतकी आहे. मात्र, खाद्य तेल उत्पादनात केवळ 6-7 टक्के इतकाच वाटा आहे. पर्यायाने दरवर्षी खाद्य तेल आयातीचे प्रमाण वाढत आहे. भारतात खाद्यतेलाची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. सुमारे 60 टक्के तेल आयात करावे लागते. जागतिक पातळीवर भारत हा पाचव्या क्रमांकाचा तेलबिया उत्पादक देश आहे, तरिही खाद्य तेलाच्या बाबतीत मोठा आयातदार देशही ठरला आहे.