नगर, (प्रतिनिधी) – खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी तालुकानिहाय कृषी विभागाच्या पथकानिहाय कृषी केंद्राची तपासणी करा, शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळाव्यात, यासाठी नियोजन करा. खते, बियाणे यासह अन्य कृषी उत्पादनाचे लिकींग होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सुचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी कृषी विभागाला दिल्या.
कृषी विभागाची जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली खरिप हंगामपूर्व आढावा व नियोजन सभा पारपडली. यासभेला जिल्हाधिकारी ऑनलाईन हजर होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संभाजी लांगोरे, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, प्रकल्प संचालक (आत्मा) गोकुळ वाघ व अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपस्थित होते.
या नियोजन बैठकीला ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत बोराळे यांनी कृषी विभागाच्या सादरीकरणादरम्यान खरिप हंगामातील पिकांचे क्षेत्र उत्पादकता, तसेच आवश्यक कृषी निविष्ठांच्या नियोजनाबाबात सविस्तर सादरीकरण करून मागील वर्षात कृषी विभागाने अंमलबजावणी केलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
जिल्हा हा महाडिबीटी पोर्टलद्वारे १ लाखापेक्षा जास्त शेतकर्यांना डिपीटीद्वारे अनुदान वितरित करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचनयोजनेंतर्गत २ हजार ७०० शेततळ्यांना अनुदान वितरित करून राज्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्यान्न प्रक्रीया योजनेमध्ये जिल्ह्यासाठी ५०० प्रस्तावांचा लक्षांक असताना जिल्ह्यात ६३० प्रस्तावांना अनुदान वितरित करून लाखांपेक्षा १३० टक्के जास्त साध्य केल्याचे सांगितले.
यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्यान्न प्रक्रीया योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रीया योजना व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांची अंमलबजावणी करणेबाबत सुचना दिल्या, तसेच जिल्ह्यात खरिप हंगामात सोयबीन व कापूस पिकाचे क्षेत्र जास्त असल्याने या पिकांची मुल्यसाखळी निर्माण करणेबाबत सुचना दिल्या.