वडूज – खटाव-माणचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, शेतकऱ्यांचे दैन्य हटविणे, औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देऊन तालुक्याचा कायापालट घडविण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन निवृत्त सनदी अधिकारी व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी केले.
देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाचे वडूज येथे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार प्रभाकर घार्गे, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, बाजार समितीचे माजी सभापती अशोक गोडसे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. अर्जुनराव खाडे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजीराव सर्वगौड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. बंडा गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, हिंदुराव गोडसे, नंदकुमार मोरे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, माजी सरपंच अर्जुन गोडसे, सोमनाथ येवले, माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, श्रीमती शशिकला देशमुख, कातरखटावचे सरपंच तानाजी बागल, संतोष पवार, माजी सरपंच प्रतापराव काटकर, नगरसेवक अभय देशमुख, किसनराव गोडसे, पृथ्वीराज गोडसे, रमेश शिंदे, एकनाथ जाधव, जावेद मनोरे, संगीता पवार, अशोकराव बैले, अण्णा काकडे, अक्षय थोरवे, मिलिंद लंगडे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, या मतदारसंघातील जनतेला काही दृष्ट प्रवृत्तींनी लाचार बनविण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या दहा वर्षांत विकासाचा ठोस अजेंडा राबविल्याचे दिसत नाही. युवा पिढीला वाम मार्गाला लावले जात आहे. दोन्ही तालुक्यांचे नुकसान रोखण्यासाठी “आमचं ठरलंय’ ही सर्वपक्षीय आघाडी स्थापन झाली आहे. त्यामध्ये माझ्यावर विश्वासाने उमेदवारीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जनताही चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे या निवडणुकीत बदल निश्चित आहे.
मला प्रशासकीय अनुभव असल्याने खटाव-माणच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करू. प्रभाकर घार्गे म्हणाले, खटाव-माण तालुक्यांना कलंक असलेल्या प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठीच “आमचं ठरलंय’मधून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खटाव-माणमध्ये आगामी काळात भरीव विकासकामे करण्याची संधी आहे. जनतेने आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशमुख यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे. विजय काळे यांनी स्वागत केले. प्रा. बंडा गोडसे यांनी आभार मानले.