जम्मू – नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि “एनआरसी’चे समर्थन करण्यासाठी शेकडो काश्मिरी निर्वासितांनी जम्मूमध्ये मोठा मोर्चा काढला होता. यामध्ये मुस्लिमांचाही समावेश होता. जागती निर्वासित छावणीचे अध्यक्ष पी.एन. भट यांच्या नेतृत्वाखालील गटाने मुस्लिमांना “राजकीय पक्षांच्या जाळ्यामध्ये न अडकण्याचे’ आवाहन केले आणि “सीएए’-“एनआरसी’च्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या सर्व निर्वासितांनी तिरंगा घेऊन काढलेल्या या मोर्च्यामध्ये नवीन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)ची देशभर अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी केली.
“सीएए’ आणि “एनआरसी’चे आम्ही समर्थन करतो. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्य अनेक दशकांपासून भारतात रहात आहेत. त्यांना नागरिकत्व मिलत आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही भारतीयांना त्रास होण्याचे काय कारण असू शकते. त्याचे आम्ही स्वागतच करू.’ असे भट यांनी पत्रकारांना सांगितले.
दहशतवाद्यांमुळे काश्मिरी पंडीतांना निर्वासितासारखे जगावे लागते आहे. मुस्लिम बहुल देशांमधील अल्पसंख्यांकांचे दुःख तेच समजू शकतील. जर आम्ही गेल्या 30 वर्षांपासून निर्वासित म्हणून रहात असू तर या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांची काय स्थिती असेल. मुस्लिम देशांमधील निर्वासितांना पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या काळातच नागरिकत्व मिळायला पाहिजे होते, असेही भट म्हणाले.