सागर येवले
पुणे – शहरात सध्या क्षयरोगावरील (टीबी) औषधांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यांपासून टीबीच्या रुग्णांना वेळेत औषधे मिळत नाहीत. तर लाइनोझोलीड आणि सायक्लोसरिन या औषधांचा पुरवठाच झालेला नाही. तर, बाहेरच्या मेडिकलमध्येही पुरेसा साठा नसल्याने रुग्ण व नातेवाइकांना औषधांसाठी पायपीट करावी लागत आहे.
पुणे महापालिकेत नोंदणी केलेले दोनशेच्या जवळपास टीबीचे रुग्ण आहेत. त्यांना देण्यात येणारी सर्व औषधे केंद्र सरकारकडून येतात. मात्र, मागील दीड ते दोन महिन्यांपासून औषधांचा पुरेसा साठा येत नसल्याने रुग्णांना महिनाभराची औषधे न देता दर आठवड्याने बोलावून औषधे दिली जात आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, सद्यस्थितीत पुणे महापालिकेने “टीबी’वरील औषधांची खरेदी स्वत: करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यासाठी 6 लाख रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. मात्र, बाजारात “टीबी’वरील औषधे तयार करणाऱ्या कंपन्या या ठराविकच आहेत. त्यांच्याकडून पुरेसा साठा होत नसल्यामुळे तुटवडा जाणवतो.
विशेष लाइनोझोलिड आणि सायक्लोसरीन ही दोन्ही औषधे मिळताना आरोग्य विभागाची तारेवरची कसरत होत आहे. तर उपलब्ध निधीतून महिनाभर पुरेल एवढाच साठा आहे, असे आरोग्य विभागाकडील क्षयरोग निर्मूलन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अशा आहेत अडचणी
क्षयरुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती अधिक आहेत. त्या सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या नाहीत. तसेच या रुग्णांना नऊ किंवा अठरा महिने दररोज औषध घ्यावे लागतात. औषधे घेतली नाहीत, तर आजार पुन्हा उद्भवू शकतो. असे असताना औषधे वेळेत मिळाली नाही; तर रुग्णांना बाहेरच्या मेडिकलमधून औषधे घ्यावी लागतात. मात्र, ती औषधे मिळत नसून मिळालीच तर आर्थिक भारही वाढत आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील व्यक्ती औषधे घेणे टाळतात.
“टीबी’ कोणत्या प्रकारचा आहे, त्यानुसार औषधोपचार दिले जातात. त्यामध्ये पाच प्रकारची औषधे असून, ही सर्व औषधे केंद्र सरकारकडून येतात. मात्र, मागील दीड महिन्यांपासून औषधांचा पुरेशा साठा येत नसून, लइनोझोलीड आणि सायक्लोसरीन ही दोन औषधे येत नाही. – प्रशांत बोठे, क्षयरोग निर्मूलन अधिकारी, आरोग्य विभाग, मनपा