गायरान गटाची प्रशासनाकडून मोजणी
वाफगाव – महाराष्ट्र शासनाने वीजेचे भारनियमन, सातत्याने विजेचा होणारा तुटवडा यामुळे शासन अपारंपरिक उर्जा स्त्रोत निर्माण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 अंतर्गत शासकीय व गायरान जागेवर सोलर वीजनिर्मिती महावितरणच्या माध्यमातून करत आहे. दरम्यान, या योजनेला पूर (ता. खेड) ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून ग्रामसभेने ठराव प्रशासनाला देऊनही प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शासनाची ही योजना कल्याणकारी असली तरी पूर गावातील तब्बल 40 हेक्टर क्षेत्र पूर गावातील दिल्यास गावातील गायरानावर 40 हेक्टर क्षेत्रात 14 ट्रीस फाउंडेशनच्या वतीने 30 हेक्टर व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 10 हेक्टर वृक्षलागवड केलेली असून वृक्षसंवर्धनासाठी फाऊंडेशनचे 5 कर्मचारी दरमहा पगारावर काम करत आहेत. तर 10 हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारीत आहे. यामुळे गावातील पशुपालन, मेंढपाळ व्यवसायिकांना चरण्यासाठी जागाच उपलब्ध राहत नाही.
तसेच गावाला गावठाणामध्ये सार्वजनिक प्रयोजनासाठी बालउद्यान, क्रिडांगण, शाळा, गोशाळा, मंदिरे यासाठी जागा नसून दीड वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय व पीएमआरडीएकडे मागणी प्रस्ताव सादर करूनही जाचक अटींमुळे प्रस्ताव प्रलंबित असताना सोलर योजनेसाठी जागा देण्यास ग्रामस्थांचा ठाम नकार असून ग्रामसभेचा तसा ठरावही वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे.
असे असतानाही सोमवारी (दि. 17) गायरान गट नंबर 261 व 561 ची मोजणी करण्यात आली. यावेळी सरपंच संगीता गावडे, उपसरपंच किरण गावडे, माजी सरपंच प्रतिभा गावडे, सदस्या लता गावडे, किशोर सावंत, अध्यक्ष गुलाबराव गावडे, माजी सरपंच संदीप गावडे, बाळासाहेब गावडे, केरूजी गावडे व ग्रामस्थांनी मोजणीस नकार दिला; मात्र महावितरणने मोजणी होऊ द्या तुमचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडा, असे सांगितले. यावेळी महावितरणचे गवारी, दत्तात्रय गावडे, पांडुरंग मते तर भूकरमापक म्हणून कांबळे उपस्थित होते.
जिल्ह्यातील 130 गावांकडे जागेची मागणी
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा व्हावा या उद्देशाने, शासकीय गायरान जागेबरोबरच खासगी जागाही भाडेतत्त्वावर घेण्याचे ठरवले आहे. या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 130 गावांकडे जागा मागणी केली असून यामध्ये खेड तालुक्यातील पूर, पांगरी व कोरेगाव बुद्रुक गावांचा समावेश आहे.
काय आहे ही योजना ?
* शेतकऱ्यांना दिवसा नियमित व भरवशाचा होणार वीजपुरवठा
* ग्रामीण भागात 19 हजार रोजगार निर्मिती
* प्रकल्पासाठी शासकीय व खासगी जमिनीचा वापर
* शेतकऱ्यांना खाजगी जमीन दिल्यास एकरी 50 हजार रुपये वार्षिक भाडे 3 टक्के वार्षिक वाढ
* खासगी-किमान तीन एकर जमीन महावितरण उपकेंद्रापासून 5 किमी अंतराच्या आत असावी उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या ग्रामपंचायतींना * 15 लाख अनुदानग्रामस्थांचे मत
* वीज प्रथम पूर गावासाठी व उर्वरीत महावितरणने विकावी
* वृक्षलागवडीचे 45 हेक्टर क्षेत्र वगळावे
* गायीगुरे चरण्यासाठी राखीव क्षेत्र असावे
* क्रीडांगण, उद्यान, शाळा, मंदिरे, व्यायामशाळा सार्वजनिक प्रयोजनासाठी 10 हेक्टर जागा शिल्लक ठेवावी
* नोकरीची संधी गावातील मुलांना प्राधान्य द्यावे
* गायरान क्षेत्रातून जाणारे रस्ते पक्के करावेत
* वृक्षसंवर्धन, जनावरांना, पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्धतेसाठी सिमेंट बंधारे, शेततळी करण्यासाठी परवानगी द्या