नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही 2-1 अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया 248 धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महत्वपूर्ण मालिकेत मुंबईकर आणि टी 20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव याची श्रेयस अय्यर याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली होती. मात्र, सूर्याला या संधीचं सोनं करता आली नाही. सूर्याने माती केली.
तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याची पहिल्याच चेंडूवर शिकार केली. अशा प्रकारे सूर्याने गोल्डन डकची हॅट्ट्रीक करून लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. वनडे मालिकेत सलग तीन वेळा पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होणारा सूर्या हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यामुळे आता सगळीकडून त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.
मात्र, अश्यातच भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी सूर्यकुमार यादव याची पाठराखण केल्याचं दिसून आलं आहे. यावेळी ते म्हणाले, “सूर्याकुमार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या फ्लॉप ठरला. तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याची पहिल्याच चेंडूवर शिकार केली. आता सूर्यकुमारने वनडे मालिकेतील निराशाजनक कामगिरीला मागे टाकून इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
जेणेकरून आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेपूर्वी तो गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद होणे ही चिंतेची बाब आहे. पण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजासोबत असे घडू शकते, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही’. असे म्हणत सुनील गावसकर त्याची पाठराखण केली आहे.
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 269 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने चांगली सुरुवात केली आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला, पण अखेरीस भारताने सतत विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ 248 धावांवर गारद झाला. आणि आपल्या हातून मालिका गमावून बसला.