साऊदम्पटन – इंग्लंडमधील बेभरवशाच्या वातावरणाचा पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीला फटका बसला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ही लढत सुरु आहे. सोमवारी चौथा दिवस पूर्णत: पावसामुळे वाया गेल्याने भारत-न्यूझीलंड कसोटी सामना अनिर्णित निकालाकडे वाटचाल करीत आहे.
अशात या ऐतिहासिक सामन्याच्या निकाल काय लागेल? याबाबत अनेक दिग्गज क्रिकेटपटू भाष्य करत आहेत. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि मदन लाल यांनी काही मार्ग सुचवले आहेत.
काहीतरी मार्ग शोधायला हवा
सुनील गावसकर यांनी माध्यमांशी चर्चा करताना म्हटले की, ‘इथे इंग्लंडमध्ये असलेले काही स्थानिक लोक आहेत, ज्यांना हवामानाचा चांगला अंदाज घेता येतो. आजही सामना होणे कठीण आहे. माझ्या मते दोन दिवसांत तीन डाव होणे कठीण आहे. हे फक्त तेव्हाच होऊ शकेल जेव्हा दोन्हीही संघ खराब फलंदाजी करतील. मात्र हा सामना रद्द होईल किंवा अनिर्णित राहिली.
“अशात जर तुम्ही जर फुटबॉलमध्ये पाहिले तर, त्यामध्ये पेनल्टी शूट आऊट असते.
टेनिसमध्येही ५ सेट असतात. तसेच टाय ब्रेकर राऊंड असतो. ज्यामुळे आपल्याला विजेता निश्चित करणे सोपे जाते. परंतु क्रिकेटमधील भारत-न्यूझीलंड हा ऐतिहासिक सामना अनिर्णीत राहण्याच्या मार्गावर आहे,” असे ते म्हणाले. पुढे जाऊन म्हणतात की, आपण वर्ल्डकप स्पर्धेत पाहिले होते की, सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणाऱ्या संघाला विजेता म्हणून जाहीर करण्यात आले होते. पण अनेकांना हे ठीक वाटले नव्हते. इथे क्रिकेट समितीला प्रत्येक गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे.
तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल म्हणाले की, “माझ्या मते हा सामना पुन्हा एकदा खेळवला गेला पाहिजे. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्स, मेलबर्न किंवा कोलकातामध्ये झाला असता तर याची मजा काही वेगळीच असती. आता भारत विरुद्ध इंग्लंड मालिका होणार आहे.
जर भारतातील वातावरण अनुकूल असेल तर हा सामना भारतात का होऊ शकत नाही. कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल याचा निकाल लागायला हवा. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही खूप मोठी स्पर्धा आहे.”