विवाहविधी हा एक उरकण्याचा उपचार झाला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एक मोठा संस्कार आता काही तासांचा इव्हेन्ट बनून राहिलाय या म्हणण्यात खरंच तथ्य आहे?
विवाह हा आजकाल स्वतःची प्रतिष्ठा दाखवून देण्याचा कार्यक्रम ठरला आहे. लग्नपत्रिका वाटण्यापासून मुलीला सासरी पाठवण्यापर्यंत प्रत्येक घटनेचा इव्हेन्ट बनला आहे. दिवसेंदिवस चालणाऱ्या लग्नांपासून आजच्या जमान्यातील फास्ट फॉरवर्ड लग्नापर्यंत अनेक बदल आपल्याला पाहायला मिळाले. सर्व स्तरांमधील लोकांचे विवाहविधी आपण पाहिले. ज्या काळी तीन-तीन दिवस लग्नसमारंभ चालत असे, तेव्हा एका गावात एकाच दिवशी दोन विवाह होत नसत.
गावकरी एकमेकांमध्ये चर्चा-विचारविनिमय करून अशा प्रकारची व्यवस्था तयार करीत असत. गावातील सामूहिकतेचे दर्शन लग्नाच्या मांडवात घडत असे. पहिल्या दिवशी वऱ्हाडी मंडळींचा परिचय सर्वांना करून दिला जात असे. लग्नघरातील लोक आणि वऱ्हाडी अपरिचित राहात नसत. वधुवरांची आत्या आणि मामा यांचा रुबाब मोठा असे. नवरदेवाचे रुसणे हाही एक विधीच असे. सध्याच्या लग्नात हसणे-खिदळणे फारसे दिसत नाही. अनेक विधी कधी आटोपले, हेही समजत नाही. पूर्वीच्या विवाहात बारा बलुतेदारांची गरज भासत असे. आपल्याकडे विवाहविधींवर आधारित जेवढे चित्रपट तयार झाले, ते सगळे सुपरहिट ठरले. कारण विवाहसमारंभात सर्व रंग एकत्रितपणे दिसतात.
आजकालच्या लग्नसमारंभांमध्ये एकच रंग दिसतो आणि तो क्षणभर खूश करणारा असतो. दोन जीवांचे मिलन घडवून आणणारा विधी एवढेच लग्नसमारंभाचे स्वरूप उरले आहे. समारंभासाठी उपस्थित राहणारे केवळ या मिलनसोहळ्याचे साक्षीदार! फोटो किंवा व्हिडिओमध्ये एखादी व्यक्ती दिसली, तरच ती लग्नास उपस्थित होती, असे मानले जाते. विवाहविधी उरकण्यासाठी काही ठिकाणी पाच ते दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागतच नाही. तेवढ्याच वेळात फोटो काढले जातात. तीन-चारशे ताटांची जेवणाची ऑर्डर दिली असेल, तर जेवणासाठी दोनशे लोकही थांबत नाहीत. याची अनेक कारणे आहेत. लग्नाचा मुहूर्त ज्या दिवशी असेल, तेव्हा प्रत्येकाला चार-पाच घरचे आमंत्रण असते. सध्या ई-कार्डचा जमाना असल्यामुळे लग्नाचे आमंत्रण तुम्हाला पोहोचले की नाही, हे विचारणारेही कुणी नसते.
लग्नात येणारा पाहुणा वरपक्षाकडील असो वा वधुपक्षाकडील, त्याला कधी आलात, कसे आलात हे विचारणारेही कुणी मांडवात नसतात. लांबचा प्रवास करून आलेला पाहुणा असेल तर घरातील कोणी त्याच्या भुकेची फिकीर करत नाही. केवळ स्नॅक्सवाले वऱ्हाडी मंडळींच्या गर्दीतून फिरत राहतात. सनई-चौघडा वगैरे गायब आहे. डीजे दणाणत असतो आणि काही लोक त्या तालावर थिरकताना दिसतात. काही लहान मुले नृत्यात पारंगत असल्यामुळे त्यांच्या आया त्यांना डीजेच्या मंचावर सोडून येतात. डीजेवालासुद्धा कोणत्याही गाण्याचा तीन-चार ओळींपेक्षा अधिक भाग लावत नाही. आपल्या आवडीच्या गीताचा आनंद घ्यायला सुरुवात केली, की दुसरे गाणे लागते.
लग्नातील वधूच्या मेकअपसाठी जशी ब्यूटीशियनची सेवा घेतली जाते, तशीच आता लग्नात नाच शिकवण्यासाठी कोरिओग्राफरची सेवाही सेवा घेतली जाऊ लागली आहे. लग्नासारख्या धार्मिक समारंभाचे रूपांतर आपण इव्हेन्टमध्ये केले आहे. मुहूर्तमेढ, हळदी, घाणा, होम, कन्यादान, सप्तपदी आदी धार्मिक विधी उरकायचे म्हणून उरकले जातात. काही विधी तर इतिहासजमा झाले आहेत. लग्नाचे सर्व विधी आता एखाद्या हॉटेल, मोटेल, रिसॉर्ट, लॉन किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी होतात. कोणताही मंगलविधी घरात होत नाही. नवऱ्या मुलीला घरातून निरोप दिला जात नाही. गडबडीत सर्व विधी आटोपून लॉनवरूनच मुलगी थेट सासरी जाण्यासाठी तयार होते. रिंग सेरिमनी हा नवाच विधी विवाह समारंभात आजकाल होतो.
आपल्याला प्रत्येक मुहुर्ताच्या दिवशी चार-पाच लग्नसमारंभांचे निमंत्रण मिळते. तेथे फक्त हजेरी लागणे महत्त्वाचे असते आणि त्याचा पुरावा म्हणून वधू-वरांसह फोटो काढला जातो. आपल्याकडे मंगलकार्य घरात करण्याची पद्धत आहे. त्याला एक मोठा शास्त्रीय आणि धार्मिक आधार आहे; परंतु आजकाल असे घडतच नाही. प्रत्येक विवाह समारंभात कृत्रिमरीत्या उभारण्यात आलेल्या शामियान्यात दहा-वीसपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती नसते. ही संख्या वधू-वर दोन्ही पक्षांमधील उपस्थितांची मिळून असते. परंतु चारशे लोकांच्या रात्रीच्या जेवणाची ऑर्डर दिलेली असताना 20-30 लोकच मांडवात राहिले आहेत,
हे पाहूनसुद्धा कुणाचे डोळे उघडत नाहीत. आपल्याकडे अनेक घरांमध्ये एक रीत आहे. एखादी व्यक्ती प्रवासासाठी घराबाहेर पडली, तर ती व्यक्ती इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंत घरात केर काढला जात नाही; परंतु आपण ज्या ठिकाणी लग्नाला जातो, तिथे मांडववाल्यांचे नोकरचाकर आणि इव्हेन्टवाले आपल्यासमोरच टेन्ट वगैरे आवरताना दिसतात. त्याविषयी आपण काही बोलूही शकत नाही. परिणामी, सात जन्माच्या बंधनासाठीचा हा विधी वधू-वरांना काही वर्षेच एकमेकांच्या बंधनात गुंतवून ठेवू शकतो.
आपल्याकडील विवाहसमारंभांचे स्वरूप रातोरात बदलले, असे म्हणता येत नाही. या बदलासाठी अनेक वर्षे लागली आहेत. जसजसे सामाजिक आणि आर्थिक बदल होत गेले, तसतसे विवाहाचे स्वरूपही बदल गेले. पूर्वी संपूर्ण समाज एका कुटुंबासारखा असे. गावातील एकाचे दुःख हे संपूर्ण गावाचे दुःख असे आणि एकाचा आनंद तो सर्वांचा आनंद असे. आता अशी परिस्थिती नाही. आता विभक्त कुटुंबपद्धती रूढ झाली. मोठमोठ्या घरांची जागा आता टू-थ्री बेडरूमच्या फ्लॅट्सनी घेतली.
अशा इमारतींमध्ये शेजारी एकमेकांना ओळखतही नाहीत. शेजाऱ्याच्या आनंदातही कुणी सामील होत नाही आणि दुःखातसुद्धा! एवढेच काय, भाऊ भावापासून तुटत चालला असेल तर इतर नात्यांची काय अपेक्षा करणार? पूर्वीच्या काळी गरिबीतसुद्धा लोक सुख शोधत होते. आता परिस्थिती अशी आहे, की शेकडोंचा स्वयंपाक तयार करून ठेवलाय; पण जेवायलाच कुणी नाही.
योगेश मिश्र