गेल्या अनेक वर्षांमध्ये जग हळूहळू का होईना, शाश्वत तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहे. कार्बन फूटप्रिंट, कार्बन बजेट, पर्यावरणस्नेही,ऑरगॅनिक अशा संज्ञा आता कुठे अंगवळणी पडायला लागल्या आहेत. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे या वाटचालीला तात्पुरती खीळ बसण्याची चिन्हं दिसत आहेत.
युद्धाचे परिणाम दोन प्रकारचे असतात. जीवितहानी आणि अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के आपल्याला लगेचच दिसतात. मात्र, युद्धाचे खरे परिणाम दीर्घकालीन धोरणातल्या बदलांमध्ये असतात. युद्धामुळे इंधनाच्या किमती भरमसाठ वाढल्या, उपलब्धता कमी झाली, त्याच्या झळा सर्वांना बसत आहेत. सध्या उन्हाळ्यात शीतकरणासाठी आणि पुढे हिवाळ्यात घर उबदार ठेवण्यासाठी पुरेशी ऊर्जा उपलब्ध नसेल, तर नागरिक कदाचित पर्यायी इंधनाचा विचार करतील.
हे पर्यायी स्रोत पर्यावरणस्नेही असतील का, हा मोठा प्रश्न आहे. युनायटेड नेशन्सच्या ताज्या अहवालानुसार, 2025 पर्यंत तापमानात अपेक्षेहूनही तीव्र वाढ होणार आहे. त्यात ही भर पडली तर ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याचे गेल्या वीस वर्षांमधले सर्वांचे प्रयत्न वाया जाणार का? क्लायमेटचेंज कमिटीने ही भीती बोलून दाखवली आहे. धान्याचे साठे आता पुरेसे असले तरी शेतीला आवश्यक ती खतं आणि इंधन वेळेवर उपलब्ध होणार का? जीवनावश्यक वस्तू तयार करण्यासाठी गरजेइतकं इंधन आपल्याकडे राहणार आहे का? हे प्रश्न आज जगापुढे उभे आहेत.
येती दोन-तीन वर्षे अशी निराशाजनक वाटली तरी दीर्घकालीन दृष्टिकोनातून या युद्धामुळे ऊर्जानिर्मिती क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू यासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याचे तोटे जर्मनी, इटली आणि ब्रिटनसारख्या देशांना जाणवू लागले आहेत. त्यांनी स्वत:च्या देशात उपलब्ध असलेल्या संसाधनांमधून ऊर्जानिर्मितीकडे ताबडतोब मोहरा वळवला आहे.
ब्रिटनला मोठा किनारा आणि तिथे भरपूर वारा यांचं वरदान असल्याने पवनऊर्जेची केंद्रांची संख्या तिथे बऱ्यापैकी आहे. पण आता त्यांनी तातडीने आणखी केंद्रांची उभारणी करायला सुरुवात केली आहे. आणखी काही युरोपियन देशांनीही ही वाट धरली आहे. नोव्हेंबर 2021 मधल्या हवामान बदल परिषदेत कोळशाचा वापर कमी करण्याचं दोनशे देशांनी मान्य केलंच आहे. अणुऊर्जेचा विचारही बेल्जियमसारखे देश पुन्हा गांभीर्याने करू लागले आहेत. अलीकडे काही फ्यूजन प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अणुऊर्जेशी संबंधित धोके कमी होत आहेत. छोटी अणुऊर्जा केंद्र उभारणे शक्य वाटू लागलं आहे. हायड्रोजन, बायोगॅस अशा इंधनांचा वापर वाढू शकतो. घरगुती पातळीवर सौर आणि पवनऊर्जेला आणखी जोमाने चालना मिळू शकते.
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या मते, ऊर्जेची ही आणीबाणी जागतिक पातळीवर आपण पहिल्यांदाच अनुभवतो आहोत. त्यामुळे जगाच्या इतिहासात हा एक निर्णायक टप्पा ठरेल. या युद्धामुळे सौर आणि इतर नैसर्गिक स्रोतांना प्राधान्य मिळून शाश्वत ऊर्जानिर्मिती वाढेल अशी आता आशा आहे.
डॉ. मेघश्री दळवी