– अरुणा सरनाईक
निसर्ग आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं योजक, कल्पक, बुद्धिमान आहे. वरवर पाहता तो मुक्तता देतो. पण प्रत्येकाची विहीत कर्म, दिनचर्या त्याने निश्चित केलेली आहे. मात्र, तरीही मनुष्य वगळता बाकी निसर्ग हा मुक्त आहे असं वाटत राहतं. वास्तविक, निसर्गातील पशुपक्ष्यांचे, वाऱ्याचे, हवेचे जे बंधमुक्तपण आपल्याला वाटते ते त्यांना बंधनकारक आहे.
आपण म्हणतो वाहणारा वारा जंगलातील झाडंझुडुपं, मुक्तपणे डोंगर-दऱ्यातून अवखळपणे वाहणारी नदी, झरे हे सारे मुक्त आहेत, स्वच्छंद आहेत, बंधनरहित आहेत. पण खरंच का आहे ते सारं खरं? आकाशात विहरणारे पक्षीदेखील मुक्त आहेत. कधीही त्यांना बघावं तर ते मुक्त वाटतात. ते एक निसर्गाचा भाग वाटतात किंवा ते सर्व मिळूनच निसर्ग म्हणा किंवा सृष्टी म्हणा बनलेली आहे; पण अगदी सूक्ष्मपणाने त्यांचे निरीक्षण केले तर त्यांच्या स्वच्छंदपणात कमालीची सूत्रबद्धता दिसते. पक्षी आकाशात उडतात ते त्यांचे एक फॉर्मेशन असते. मध्यभागी एक पक्षी आणि दोन समान सारख्या रांगात बाकीचे पक्षी असतात. त्यात जे नवशिके असतात त्यांना अनुभवी पक्ष्यांकडून संरक्षण मिळते. यामध्ये तो दुसऱ्याचा-माझा असा भेद पक्षी करत नाहीत. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पक्षी आनंदाने निभवतात. हा त्यांच्या स्वच्छंदपणातील जबाबदारीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यातही एक अर्थपूर्णता आहे. आपण स्वत:ला त्यांच्यापासून वेगळे कल्पून आहोत का? मला वाटतं की आपण बुद्धीचा वापर करून त्यांच्यापासून मानवजातीला अलग केलेलं आहे. आजही ते निसर्गाचा भाग आहेत, मात्र आपण दूर गेलेलो आहोत.
तसे पाहिले तर मनुष्य वगळता बाकी निसर्ग हा मुक्त आहे असं वाटत राहतं, पण जर विचार केला तर त्यातील खरी गोष्ट लक्षात येईल त्यांचे जे बंधमुक्तपण आपल्याला वाटते ते त्यांना बंधनकारक आहे. कारण, तेच त्यांचे विहीत कार्य आहे. ज्याप्रमाणे आपला जीवनक्रम निसर्गाने निश्चित केला आहे, ठरविलेला आहे, आखून दिलेला आहे; पण तो आपल्याला बंधनकारक वाटतो. पण मग पक्ष्यांचादेखील जीवनक्रम ठरविलेला आहे, जो वरवर पाहता विमुक्त वाटतो तो त्यांचा दिनक्रम आहे. त्यांनाही तो बंधनकारकच असेल का? पण ते निसर्गक्रमाच्या विरोधात जात नाहीत. आपल्या मर्यादेत राहतात.
जंगलात पेटणारा अग्नी हेदेखील निसर्गाच्या मुक्तीचे, ज्याला बेछुटपण म्हणता येईल असेच काहीसे आहे. त्यावेळी तो कोणतीही तमा बाळगत नाही. सर्वभक्षीपणाने तो सर्वांना आपल्यात सामावून भस्म करतो. शीतल मोकळा वारा, मोकळ्या मनाने वाहत असतो तो आपल्याला सुखावतो. त्याचे बंधमुक्त कार्य आपल्याला विहीत कार्य वाटत असते. कधी त्यालाही वाटते त्याच्या मर्जीने स्वच्छंद वाहावं. पण तसं झालं तर तेव्हा काय उत्पात होतात ते आपल्याला ठाऊक आहे. निसर्ग आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं योजक, कल्पक, बुद्धिमान आहे. वरवर पाहता तो मुक्तता देतो. पण प्रत्येकाची विहीत कर्म, दिनचर्या त्याने निश्चित केलेली आहे. जसं प्रभात वेळी पाखरांना आपलं घरटं सोडून बाहेर पडावंच लागतं. गाईवासरांना चरण्यासाठी जंगलात जावंच लागतं. झाडं, जंगलं, नद्या कोणतंही वाहतं पाणी या सर्वांना आखून दिलेल्या क्रमानंचं जावं लागतं. आज हजारो वर्षे उलटलीत; पण सागराने आपली मर्यादा कधीतरीच ओलांडलेली दिसते.
तेव्हाचे त्याचे वागणं हे मुक्तपणाचे नव्हे तर उन्मुक्तपणाचे, बेफामपणाचे मानले गेलेले आहे आणि त्यामुळे झालेले अपरिमित नुकसान सर्वांना ज्ञात आहे. क्षमाशीलतेत पृथ्वी अगदी आदर्श मानली गेली आहे. क्षमाशीलता हीदेखील तिची सृष्टीकर्त्याने तिला घातलेली मर्यादाच होय आणि ती मानते देखील. पण कधी अनावर होऊन, बंधमुक्त होऊन ती जो उत्पात घडवून आणते तो विश्वसंहारक असतो. मानव अनावर होऊन किती होणार, आपल्या मर्यादा त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. मर्यादाशीलपणा हा सृष्टीचा नियम आहे आणि तो कोणी मोडू नये, असा अलिखित नियम आहे. मर्यादा रेषा ओलांडल्यावर काय काय होतं ते आपल्याला ज्ञात आहे. याची मूर्तिमंत उदाहरणं आपल्या इतिहासात, धर्मग्रंथात दिलेली आहेत, ती शिकवण आपण कुठे शिकतो?
काही वेळा शिकली, तरी आत्मसात केली, तरी आचरणात आणत नाही. खरं तर आपलं आयुष्य इतकं सुलभ, सुखाचं आणि आनंदाचं होऊ शकते जे देऊन संपू शकत नाही, ज्यांच्याकडून घेऊन संपत नाही, ज्याची ईर्ष्या केली तरी जे आटत नाही, जे सर्व चराचरात व्यापून आहे ते प्रेम! होय. ते मुक्त आहे. नात्यानं वरवर पाहता बंदिस्त असलं तरी बंधरहीत आहे. ते सूर्यप्रकाशासारखं सर्वांना आपल्या कवेत घेत असतं ते प्रेम! ज्याच्यावर एका ठरावीक कुणाचा हक्क नाही. जे, हा माझा, हा तुझा हा भेद मानत नाही असं ते प्रेम आहे.