– अरुण गोखले
मानवी जीवन आणि त्याच्या भोवतालचे पशु-पक्षी आणि प्राणीजगत याचं एक फार जवळचं नातं आहे. लहान मुलं ही तर त्या चिऊ काऊचा घास खात खातच मोठी होत असतात. हा घास चिऊचा, हा घास काऊचा असं म्हणून बाळाला प्रेमाने भरवलेल्या घासातूनच त्याचे संगोपन संवर्धन होत असते. त्याच्या भोवतालच्या खेळण्यामध्येसुद्धा चाकाचा मोर, हत्ती, बदकांची गाडी, झांजा वाजवणारे माकड यांचा समावेश असतो. त्या खेळण्यासोबत खेळत आणि अंगणातल्या चिऊ काऊच्या मागे धावत मुलं चालायला आणि पळायला शिकतात.
इथे अगदी बालपणीची बाळाचे सवंगडी ही कविता आठवते.
त्यात बाळाच्या भावविश्वात त्याच्या भोवती येणाऱ्या, त्याच्याशी खेळणाऱ्या त्याच मनोरंजन करणाऱ्या अशा पशु-पक्ष्यांचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. बाळाला दूूध भात भरवणारे चिऊ काऊ, त्याला पेरूची गोड फोड देणारा पोपट दादा, त्याच्याशी अंगणात येऊन नाचून दाखवणारी मैना, बाळाच्या पायात रेंगाळणारी मनीमाऊ, त्याच्याशी खेळणारा खोडकर मोत्या, हे सारे त्या बाळाचे बालपणाचे सवंगडी असतात. त्यांच्याशी खेळत खेळतच बाळ लहानाचे मोठे होते. त्याच्या वाढत्या वयाबरोबरच त्याच्या आवडीच्या यातील काही मित्रांची त्याची त्यांच्याशी असलेली मैत्री, जिव्हाळा आणि आपुलकी ही वयोमानानुसार वाढत जाते.
आधी बालवयात लहान मुलं हे या प्राणी-पक्ष्यांच्या सोबतीने खायला, प्यायला शिकलेले असते आणि तेच थोडे मोठे झाले की तेच मूल मग त्यांची काळजी घेऊ लागते. मग बाळच चिऊ काऊला दाणे टाकतो, मोत्याला भाकरतुकडा देतो, गायीला चारा भरवतो, तर पोपटाला भिजवलेली डाळ आणि हिरवी मिरची देतो. या मैत्रीची दिवसेंदिवस वाढ होत जाते. मग तोच त्या आपल्या मित्रांच्या नित्य भेटीसाठी त्यांच्याशी सुखसंवाद करण्यासाठी त्यांच्याशी आपली जवळीक वाढवतो. मग तोच उन्हाळाच्या दिवसात त्यांच्यासाठी अंगणात पाण्याची सोय करतो. तर थंडीत दाराशी अंग मुरडून झोपलेल्या मोत्याच्या अंगावर प्रेमाने त्याला थंडी वाजू नये म्हणून जाडसर पोत घालतो. कशामुळे तर त्याच्या सोबतीच्या मित्रांमधील प्रेमामुळे आपुलकी आणि जिव्हाळ्यामुळेच.