राहुरी – अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या सर्व प्रकारच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी नायब तहसीलदार सचिन औटी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या आदेशानुसार दि. 1 ते 5 मेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने झालेल्या शेतमालाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे सरकारी आदेश तत्काळ रद्द करून अवकाळी पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान व परिस्थिती याबाबत सरकार निर्णयांमध्ये नमूद केलेले फक्त उभ्या पिकांचे किंवा शेतात असलेल्या मालाचे पंचनामे करावे ही बाब अत्यंत चुकीची व शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे.
शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस झाल्यानंतर तत्काळ शेतातील शेतमाल जेवढा हाताशी येईल त्यानुसार काढून घेतला आणि आपली शेत मोकळे केलेले आहे. उर्वरित शेतमाल शेतातच खराब होऊन गेला. त्यामुळे पंचनाम्यावेळी शेतात कोणत्याही प्रकारचे उभे पीक किंवा शेतमाल शिल्लक राहिले नाही.
त्यामुळे महसूल कर्मचारी हे नुकसान झालेल्या व गारपिटीमुळे शेतकऱ्यांनी काढून घेतलेल्या पिकाचे पंचनामे करण्यास तयार नसून ही सरकारद्वारे शेतकऱ्यांची घोर फसवणूक असून, पीकपेर नोंदीनुसार सर्वांना नुकसानभरपाई पंचनाम्याद्वारे मिळावी व सध्या सरकारी निर्णय दुरुस्ती करून योग्य ती कार्यवाही करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
ही कार्यवाही झाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारविरुद्ध आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, जुगलकुमार गोसावी, सुनील इंगळे, सतीश म्हसे, राहुल करपे, सचिन गाडगुळे, राहुल काळे, गणेश आघाव, अभिजीत खडके आदींच्या सह्या आहेत.